Aapan Sare Arjun
आपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वसंत पुरुषोत्तम काळे यांना ब्रेन ट्युमरने मृत्यू पावलेल्या आपल्या प्रिय पत्नीच्या दुराव्यानंतर अंतर्बाह्य उन्मळत असल्याचा प्रत्यय आला. आपण सुपर संभ्रमात विषादावस्थेत सापडलो आहोत असे वाटले. त्या मन:स्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना एका मित्राने ओशो रजनीश यांच्या गीतेवरील प्रवचनांच्या कॅसेट्स भेट देऊन, त्या ऐकण्यास सांगितले. आणि आश्चर्य हे की त्या कॅसेटस ऐकून वपुंना जगण्याचे नवे बळ मिळाले. भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून तो मानसशास्त्रावरचा पहिला जागतिक ग्रंथ आहे हे त्यांना उमगले. आपण स्वत:च अर्जुन आहोत, आणि स्वत:च नव्हे तर प्रत्येक माणूस हा अर्जुन आहे, आणि त्याला अर्जुनाप्रमाणेच आपण पदोपदी कोंडीत सापडल्याची, गोंधळल्याची, संभ्रमाची जाणीव होते, असेही त्यांना कळून चुकले. महाभारताला शेवट नाही, फक्त सुरुवात आहे अशीही एक कल्पना वपु भारावून मांडतात. ओशो रजनीशांच्या कॅसेट्सनी आपल्याला श्रीकृष्ण उलगडून दाखवला, महाभारताचा वेगळा अर्थ सांगितला. माणूस कळायला एक नवा डोळा दिला असे म्हणून वपु 'आपण सारे अर्जुन’ या लेखमालेच्या रूपाने स्वैर व स्वच्छंद चिंतन मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यातील पहिल्या 19 लेखांचा (किंवा प्रवचनांचा) हा संग्रह. वपुंच्या कथाशैलीवर मराठी माणूस फिदा आहे. वपुंच्या गोष्टीवेल्हाळ प्रकृतीला असा स्वैर मुक्त चिंतनाचा फॉर्म साजेसा आहे.