-
Tablet (टॅब्लेट)
मुंबईमध्ये एका बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनीत केमिस्ट म्हणून महेश नोकरीला लागतो. ही नोकरी त्याला केवळ त्याच्या हुशारीवर मिळालेली असते. दैव मात्र ती हिसकावून घेणार असते पण त्याचे नशीब बलवत्तर असल्यामुळे ती नोकरी त्याला मिळते. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात 'टाय' लावून जाणाऱ्या व्यक्तीकडे नशीबवान नोकरदार म्हणून पाहिले जायचे पण तिथे कामाची जबाबदारीही तितकीच असे. औषधे बनवणाऱ्या या कंपनीत विश्लेषक केमिस्ट म्हणून महेश लागतो. पण त्याच्या हुशारीवर तो उत्पादन खात्यात जातो कारण इथे कर्तृत्व दाखवण्याची जास्त संधी असते. इथे कामगारांशी संबंध येतो. त्यांच्या युनियनशी बोलावे लागते हे सर्व अत्यंत जबाबदारीने करणे जरूर असते. त्याचबरोबर कंपनीने दिलेले उत्पादनाचे 'टारगेट' कामगारांच्या सहकार्याने पुरे करणे जरुरीचे असते. औषधाच्या उत्पादनात अनेक अडचणी येतात. उत्पादनाची मशीन्स व्यवस्थित राखणे, त्यावर काम करणाऱ्या कामगाराकडून उत्पादन प्रोग्रामप्रमाणे काढून घेणे, एकीकडे वरिष्ठांची मर्जी सांभाळणे तर दुसरीकडे कामगारांमध्ये एकोपा राखणे, या सगळ्यात एक-एक तासाने उत्पादनाचा दर्जा तपासण्याकरिता येणाऱ्या गुणवत्ता विभागाच्या 'केमिस्टच्या' तक्रारी दूर करणे एक का अनेक अडचणी. हे सर्व महेश कसे पार पाडतो आणि शेवटी Managementची मर्जी संपादन करीत एक एक प्रमोशन घेत VICE PRESIDENT (PRODUCTION) या उच्च पदापर्यंत कसा पोचतो आणि शेवटी कंपनीच्या नियमाप्रमाणे साठाव्या वर्षी निवृत्त होतो. पण तो खरोखरीच निवृत्त होतो का? या प्रश्नाचे उत्तर कादंबरी शेवटपर्यंत वाचल्यावरच कळेल....
-
Plasi Panipat Ani Baksar (प्लासी, पानिपत आणि बक्सर
१७५७ साली झालेली प्लासीची लढाई ही बऱ्याच इतिहासकारांच्या मते लष्करी दृष्ट्या केवळ चकमक म्हणावी या दर्जाची होती. इंग्रज आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये झालेली ही लढाई ही खरे म्हणजे पीडलेल्या मुघल अधिकाऱ्यांनी आणि अन्यायग्रस्त हिन्दू व्यापाऱ्यांनी इंग्रजांच्या मदतीने सिराज उद्दौलाच्या क्रूर आणि मनमानी राजवटीविरुद्ध केलेले बंड होते. १७६१ साली पानिपत येथे अहमद शहा अब्दाली विरुद्ध महायुद्धासमान झालेल्या लढाईत मराठ्यांचा मोठा पराभव झाला, पण या पराभवामुळे हिन्दुस्थानच्या राजकारणात झालेली मराठ्यांची पिछेहाट जेमतेम दहा वर्षे टिकली, तरीही पानिपतच्या पराभवाची सल ही मराठी अंत:करणातून काही जात नाही.पनिपतचे युद्ध ही मराठी माणसाच्या शौर्याची, त्याच्या अस्मितेची, त्याच्या पराक्रमाची, त्यांच्या पराकाष्ठेच्या परिश्रमांची तशीच त्यांच्यातल्या आपसातल्या हेव्यादाव्यांची, त्यांच्यातल्या भाऊबंदकीची, त्यांच्यातल्या मुत्सद्दीपणाच्या अभावाची आणि शेवटी त्यांच्या हौतात्म्याची कथा आहे. १७६४ साली बक्सर येथे इंग्रजांविरुद्ध बंगालचा पदच्युत नवाब मिर कासीम, अवधचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशहा शहा आलम २ यांनी एकत्र दिलेल्या लढाईचे नावही जरी अनेकांनी ऐकले नसले तरी या मध्यम श्रेणीच्या लढाईतील विजयामुळे इंग्रजांना मुघल बादशहाकडून बंगाल सुभ्याचा महसूल वसूल करण्याचे अधिकार कायमचे प्राप्त झाले व त्यामुळे इंग्रजी सत्तेचे पाय हिन्दुस्थानात भक्कमपणे रोवले गेले. एका वेगळ्या दृष्टीकोनातून हिन्दूस्थानातल्या या तीन भिन्न श्रेणींच्या लढ्याचे केलेले वर्णन आणि विवेचन रसिक वाचकांच्या मनाचा वेध घेईल यात शंका नाही.
-
Masalevaik Mansa(मासलेवाईक माणसं)
'मासलेवाईक माणसं' या कथासंग्रहात सामान्य व्यक्तिरेखा आहेत. नंदकुमार विजयकर या कथालेखकाने त्या उच्चतम पदावर नेऊन ठेवल्या आहेत. नावाप्रमाणेच व्यक्तिरेखेतील स्वभाव, गुणवैशिष्ट्ये व त्यांच्यातील दोषांवर मात करून गुणसौंदर्य आपल्या लेखणीने कथेत मिश्कीलपणे उतरवून वाचकांचे हृदय खेचून घेतलेले आहे. अनेक ढंगांच्या आवडीनिवडी, व्याधी जोपासणाऱ्या, त्यावर मात करणाऱ्या व्यक्ती, एकोणिशे पन्नासनंतरच्या संस्कृती-संस्कारांचे चित्रण, चाळसंस्कृती आणि नाते, माणुसकी जपणाऱ्या पिढीचे चित्रण या कथासंग्रहात अनुभवास येते. भाषेतील हेलकावे, वागण्याबोलण्यातील लकबी, भाषांची लज्जत या अनेकविध गोष्टींचे चित्रण या कथांतून व्यक्त होते.
-
Buran Ghatitil Te Tevis Tas (बुरान घाटीतील ते तेवी
ट्रेकचे थरारक अनुभव, हिमालयाचे रौद्र रूप, अतिउंचावरील आजाराची लक्षणे व परिणाम इत्यादी सर्व नेमक्या शब्दात मांडले आहे. अतिबर्फवृष्टीमुळे दोन सदस्यांच्या जीवावर बेतले त्यांना मृत्यूच्या दाढेतून सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून बाहेर काढले. अश्या अनेक थरारक अनुभव घेतलेल्या ट्रेकचे वर्णन लेखिकेने केले आहे. त्यामुळे हा सर्व अनुभव एक अभ्यासाचा विषय झाला आहे. कारण साहसी खेळामध्ये अनुभव हाच सर्वात मोठा गुरु व मार्गदर्शक असतो.