-
Sherlock Holmes Chya Samagra Kadambarya (शेरलॉक होम्सच्या समग्र कादंबऱ्या)
सर आर्थर कॉनन डॉयल (१८५९-१९३०) हे स्कॉटिश लेखक होते. त्यांनी जवळजवळ १२५ वर्षांपूर्वी निर्माण केलेलं ‘शेरलॉक होम्स’ हे काल्पनिक पात्र आजही जगातल्या सर्वांत लोकप्रिय नायकांपैकी एक आहे. त्यांच्या कामाचा आवाका अफाट होता. त्यांनी २००हून अधिक कथा, कादंबर्या, कविता, नाटकं इत्यादींचं लेखन केलं. त्यात शेरलॉक होम्स मालिकेतल्या ४ कादंबर्या आणि ५ कथासंग्रहांचा समावेश आहे. रहस्यकथा-लेखनातला एक मापदंड म्हणून आजही जगभर या कादंबर्या ओळखल्या जातात. त्यांच्या लिखाणावर आजवर अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, नाटकं रचली गेली आहेत. एक शतकाहून अधिक काळ लोटून गेल्यानंतरही लहान-मोठे वाचक त्यांच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथांचा मनमुराद आस्वाद घेत आहेत
-
Samagra Jim Corbett (समग्र जिम कॉर्बेट)
जिम कॉर्बेट वंशाने भारतीय नसले, तरी त्यांचा जन्म भारतातल्या नैनितालमध्ये झाला आहे. तसंच आपल्याला ते ‘वाघांचा शिकार करणारा शिकारी’ म्हणून परिचित असले, तरी ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलं, प्राणी, निसर्ग आणि त्याचाच भाग असलेली माणसं असं तो सगळं एकसंध पाहतो. शिकार करतानाची जिम कॉर्बेटची तन्मयता जितकी लोभस आहे, तितकीच त्या प्राण्याबाबतची आत्मीयताही! म्हणूनच या थरारक कथा रूढार्थाने आपल्याला हिंसक भावनेचा प्रत्यय देत नाहीत. उलट त्या माणसातला निसर्ग जागा करणार्या किंवा शाबूत ठेवणार्या कथा आहेत. या कथा आजही आपल्याला इतकं वेधून का घेतात? कारण पांढरपेशा जगण्यातला चूक-बरोबरचा फास आणि तो आवळण्यासाठीचे गळे या कथांना ठाऊक नाहीत. यांच्या ठायी नर्मविनोद आहे, पण त्यांना उपेक्षा करणं माहीत नाही. त्या उघड्या तोंडाच्या गोष्टी आहेत. राग-लोभासहित माणसातला निसर्ग आणि निसर्गासकटचा माणूस पोटात घेणार्या गोष्टी आहेत. म्हणूनच त्या वाघांच्या शिकारीच्या उत्कंठेसाठी वाचल्या जात असल्या, तरी निश्चितच फक्त वाघांपुरत्या मर्यादित राहत नाहीत... स्वतःतल्या खोल जंगलात उतरायला त्या आपल्याला भाग पाडतात. सुप्रसिद्ध शिकारी व निसर्गसंवर्धक जिम कॉर्बेटच्या अजरामर जंगल कथा.
-
Maharashtratil Leni (महाराष्ट्रातील लेणी)
महाराष्ट्राची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यात दुर्ग आणि लेणी ही महान वैशिष्ट्ये होत. जगातील सर्वाधिक दुर्ग (किल्ले) नि लेणी महाराष्ट्रात आहेत. दुर्गांकडे त्यामानाने पर्यटकांचे, अभ्यासकांचे, जिज्ञासूंचे बर्यापैकी लक्ष वेधले गेलेले आहे, पण लेण्यांकडे त्यामानाने अजून तितकेसे लक्ष गेलेले नाही. अजंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, घारापुरी, बेडसे (भेडसे), कान्हेरी आदी लेणी चांगल्या प्रकारे प्रसिद्धी पावलेली आहेत पण त्याव्यतिरिक्तही खूप-खूप लेणी महाराष्ट्रात आहेत. ही संख्या शंभरच्या पुढे आहे. लेणी हा आपला महान अलंकार आहे, वैभव आहे. समृद्ध सांस्कृतिक ठेवा आहे.अशा लेण्यांचा इतिहास सुमारे दोन-सव्वादोन सहस्र वर्षांचा आहे. डोंगरात खोदलेली ही लेणी हे अद्भुत शिल्प बघून मनुष्य थक्क होतो. लेणी पाहाणे, अभ्यासणे, हा मोठाच आनंद आहे. ही लेणी आपल्याला प्राचीन काळात घेऊन जातात. वैदिक-बौद्ध-जैन ह्यांच्या एकात्मतेचा हा वारसा आहे. पर्यटक, अभ्यासक, प्रवासी, सहलींचा आनंद लुटणारे ह्यांच्यासाठी हे पुस्तक आवर्जून सिद्ध केलेले आहे. त्यामुळे लेणी समजून घेणे सोपे जाईल. तीस लेण्यांचा इथे परिचय करुन दिलेला आहे. आपण अवश्य पाहावे, वाचावे, संग्रहावे असे हे पुस्तक.
-
Jungle Lor Aani Tree Tops (जंगल लोर आणि ट्री टॉप्स)
आता माझ्यापासून वीस यार्डांवर एक वाघ उभा होता. त्याच्या त्या सुंदर, चमकदार त्वचेवर हिवाळ्यातलं ऊन पडून ती आणखी चमकत होती. असं छायाचित्र मिळवण्यासाठी मी एरवी कुठेही गेलो असतो आणि काहीही दिलं असतं. मी अनेकदा तासन्तास किंवा दिवसच्या दिवस वाघाच्या मागावर राहिलो आहे आणि तो दिसल्यावर रायफल उंचावून, काळजीपूर्वक नेम धरून ती तशीच खाली घेतली आहे. नंतर त्या वाघाचं लक्ष वेधून घेऊन, डोक्यावरची टोपी उचलून त्याला अभिवादन केलं आहे. मला त्याला पाहण्याचा मिळालेला आनंद मी या पद्धतीने व्यक्त केला आहे. रूढार्थाने ‘शिकारी’ असणार्या या माणसाचा प्रवास म्हणूनच शूटिंगपासून शूटिंगपर्यंत (शिकारीपासून चित्रीकरणापर्यंत) पोहोचल्याचं लक्षात येतं. शिकार करण्याने त्याला सावध, अभ्यासू आणि चिकित्सक केलं असलं, तरी हे सजगपण त्याला केवळ निसर्गाचा उपभोग घ्यायला शिकवत नाही... उलट ही त्याच्या निसर्गात विरघळत जाण्यासाठीची नांदी ठरते.
-
Aajchya Divshi Itihasachya Pananmadhun (आजच्या दिवशी इतिहासाच्या पानांमधून)
"मानवी इतिहासाचे अवलोकन केल्यास सामान्य माणसांनी आंतरिक ऊर्मीतून केलेल्या कृतींमधून बहुतांश इतिहास रचला गेल्याचे लक्षात येते. शास्त्रज्ञांचे शोध, कलाकारांच्या कलाकृती, समाज सुधारणा, विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीमागील कथा अशाच आंतरिक ऊर्मीचे दर्शन घडवतात. ठरवून केलेले विक्षिप्त प्रवास आणि जीवावर बेततील अशी साहसे करणार्या व्यक्तीही आंतरिक ऊर्मीने पछाडलेल्या दिसतात आणि इतिहास घडत जातो. या सत्यकथांमधून माणसातील सहृदयतेचे दर्शन होत रहाते तर कधीकधी हिंस्त्र प्रवृत्तीही जाणवते. हजारो वर्षांच्या इतिहासातील ३६५ अनोख्या आणि वैविध्यपूर्ण सत्यकथांना आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या इतिहास घडवणार्या व्यक्तिमत्वांना या पुस्तकातून लेखक र. कृ. कुलकर्णी यांनी प्रस्तुत केले आहे. या कथा वाचकांसाठी मनोरंजक आणि विचारप्रवर्तक ठरतील याविषयी खात्री वाटते."
-
Phoenix Bharari (फिनिक्स भरारी)
"प्राचीन इजिप्त आणि ग्रीक संस्कृतीत ‘फिनिक्स’ या पौराणिक पक्षाला महत्त्वाचे स्थान आहे. अमरत्व प्राप्त असलेला हा तेजस्वी पक्षी अखेरीस जळून राख होतो. परंतु याच राखेतून पुनर्जन्म घेऊन तो नव्या आयुष्यास सुरुवात करतो. माणसाचे जीवनही असेच असते. आयुष्यात जेथे सर्व आशा, आकांक्षा लोप पावतात, तिथेच नव्या पर्वाची सुरुवात होते. जीवनातील कटू-सुखद अनुभवांतून नवीन भरारी घेण्यासाठी आपण स्वतःला सिद्ध करत असतो. ‘फिनिक्स भरारी’ या आत्मकथनातील फायनान्स गुरु राम गायकवाड यांचा प्रवास असाच थक्क करणारा आणि वाचकांना नव-ऊर्जा देणारा आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रतिकूलतेच्या गर्तेतून गगनभरारी घेणाऱ्या राम गायकवाड यांची संघर्षमय चरित्र कहाणी वाचकांना आयुष्यातील आव्हानांशी सामना करण्याची प्रेरणा आणि सकारात्मकतेची अनुभूति देईल अशी खात्री वाटते."
-
Prabhavshali Arthshastradnya (प्रभावशाली अर्थशास्त
अर्थशास्त्र विषयात मूलभूत योगदान देणाऱ्या तसेच अर्थशास्त्रात भरीव कामगिरी करून नोबेल पुरस्कार हा सन्मान प्राप्त करणाऱ्या जगातील श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञांचा प्रेरणादायी जीवन प्रवास या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा व शोधनिबंध इत्यादी संदर्भ देण्यात आले आहेत. जेणेकरून अभ्यासक व विद्यार्थी यांना त्यांच्या संशोधनाचा सखोल अभ्यास करणे शक्य होईल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) अर्थशास्त्र विषयाशी संबंधित संदर्भग्रंथ म्हणून तसेच श्रेयांक मानांकासाठी ऐच्छिक विषय म्हणून अभ्यासकांना व विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
-
Rudraprayagcha Narbhakshak Bibtya (रुद्रप्रयागचा न
"एका अवलिया शिकार्याच्या या अजब शिकारकथा आहेत. या थरारक आहेत, पण फक्त थराराचाच अनुभव देणार्या कथा नाहीत. माणूस आणि प्राणी यांच्यातला निसर्ग सांगणार्या, त्यांच्यातली पेचात टाकणारी समीकरणं दर्शवणार्या कथा आहेत. आजच्या गतिमान युगाला अपेक्षित टिपेच्या अनुभवाची कुठलीही कळ त्या दाबत नाहीत, पण पाऊलही न वाजवता निसर्गासोबतच्या दीर्घ प्रवासाची खुमारी आणि त्याच्या सूक्ष्म निरीक्षणांचे अमीट तरंग त्या मनावर उमटवल्याशिवाय राहत नाहीत. खड्ड्यात मरून पडलेला बिबट्या नरभक्षकच असल्याचं सिद्ध करण्यासाठीचा कोणताही पुरावा माझ्यासमोर नव्हता, पण तो नरभक्षक बिबट्याच असल्याचं समजायला मला एका सेकंदाचाही वेळ लागला नव्हता. मात्र तो त्या पंडितच्या भाषेतला कुणी सैतान नव्हता. मला रात्र रात्र जागायला लावून कुठूनतरी मला बघत असलेला, त्याला मारण्याचे माझे प्रयत्न व्यर्थ चाललेले बघून विकट हसत असलेला, माझ्या बेसावध होण्याची जिभल्या चाटत वाट बघणारा, माझ्या गळ्यात आपले सुळे रोवायच्या संधीची वाट बघत असणारा कुणी दुष्ट प्राणी नव्हता. इथे तर एक साधा, वय झालेला बिबट्या मरून पडला होता. त्याचा गुन्हा एकच होता. तोही निसर्गाच्या कायद्याच्या विरुद्ध केलेला गुन्हा नव्हता, तर मानवतेच्या विरुद्ध केलेला गुन्हा होता. तो म्हणजे, त्याने माणसाचं रक्त सांडलं होतं. त्यातून त्याला माणसांमध्ये दहशत माजवायची होती, असंही नव्हतं. तर त्याला स्वत:ला जगायचं होतं. त्यासाठी त्याने हे सगळे उद्योग केले होते!
-
Marathi Sattecha Samrajyavistar (मराठी सत्तेचा साम
"सतराव्या शतकात महाराष्ट्रात मराठी सत्तेचा उदय झाला. त्या शतकाच्या उत्तरार्धातच येथे मराठ्यांचे राज्य निर्माण झाल्याचा पुकारा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेऊन केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या नवोदित स्वराज्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत बिकट परिस्थितीत कसोटीच्या काळात हे नवे राज्य सांभाळले. त्यांच्या नंतर छत्रपती राजाराम महाराज यांनाही मोठ्या संकटांना तोंड देत राज्य राखावे लागले. तथापि त्यांची दृष्टी केवळ राज्य राखण्यावर नव्हती, तर त्याचा विस्तार करण्याच्या बाण्याची होती. राजाराम महाराजांनंतर महाराणी ताराबाई यांनीही अविरत संघर्ष करून मराठ्यांचे राज्य टिकविले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या आणि त्या अगोदर राजाराम महाराजांच्या काळातही मराठी फौजा नर्मदा पार झाल्या होत्या. छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली बाळाजी विश्वनाथाने मराठ्यांच्या साम्राज्य विस्तारास नवी क्षितिजे निर्माण करून दिली. पेशवा बाजीरावांच्या काळात तर मराठ्यांच्या स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यात झाले. शिवोत्तर कालखंड ते श्रीमंत पेशवा बाजीराव असा मराठ्यांच्या साम्राज्यविस्ताराचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्या दृष्टीने बाजीराव पेशवेपूर्व काळातही मराठ्यांच्या साम्राज्यविस्ताराच्या प्रयत्नांची दखल घेऊन बाजीराव पेशव्यांच्या काळापर्यंतचा इतिहास मांडण्याचे इथे योजले आहे. इतिहासाचे अभ्यासक आणि सामान्य वाचक अशा सर्वांना हे पुस्तक पसंत पडेल अशी खात्री वाटते.
-
Pashchimatya Samajshastradnya (पाश्चिमात्य समाजशास
समाजशास्त्रीय सिद्धांत व सिद्धांतकार यांच्या अभ्यासाला समाजशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यांनी मांडलेल्या संज्ञा, संकल्पना, सिद्धांत व दृष्टिकोन या सर्वांची अभ्यासकांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. समाजशास्त्रातील लहानात लहान संज्ञा असो वा वापरलेले शब्द असो ते यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात. समाजशास्त्राच्या प्रारंभीच्या बांधणीत ज्या समाजशास्त्रज्ञांनी योगदान दिले त्या काहींचा येथे समावेश केला आहे. ज्यामध्ये ऑगस्त कॉम्त, कार्ल मार्क्स, हर्बर्ट स्पेन्सर, ए. आर. रॅडक्लिफ ब्राऊन, एमिल डर्कहेम, मॅक्स वेबर, टॉलकॉट पार्सन्स आणि रॉबर्ट मर्टन या विचारवंतांचा समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा देण्यात मोलाचा वाटा आहे. अनेक अभ्यासक व शास्त्रज्ञांनी अनेक संज्ञा, संकल्पना, सिद्धांत व दृष्टिकोनांची मांडणी करून या विषयाला लोकप्रिय बनविले. समाजशास्त्र या विषयाची आवश्यकता लक्षात घेत आज जगभरातील लाखो अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ अध्ययन करीत आहेत ही एक महत्त्वाची बाब आहे. ‘पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञ’ या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये जगभरातील काही महत्त्वाच्या समाजशास्त्रज्ञांच्या सिद्धांताचे विस्ताराने विश्लेषण करण्यात आले आहे, ज्याचा फायदा विद्यार्थी, अभ्यासक व प्राध्यापक या सर्वांना निश्चितच होईल असा आम्हाला विश्वास वाटतो.