-
Kanya Zali Ho (कन्या झाली हो)
भारतीय समाजाने स्त्रियांवर हजारो वर्षे अनन्वित अत्याचार केले. याविरूद्ध राजाराम मोहनरॉय, महात्मा फुले वगैरेंनी आवाज उठवला आणि स्त्रियांच्या प्रगतीचा मार्ग हळूहळू मोकळा होत गेला. मात्र विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात असं लक्षात आलं की स्त्रियांवर अन्याय फक्त भारतातच होतात असं नाही, युरोप/अमेरिकासारखे प्रगत देशसुद्धा याला अपवाद नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५-१९८५ हे 'स्त्रीमुक्तीचे दशक' म्हणून घोषित केले. यामुळे स्त्रीमुक्तीला जागतिक आयाम प्राप्त झाला. याचे जगभर परिणाम झाले तसेच पडसाद उमटले. असेच पडसाद मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या, एका विवाहित, मध्यमवयीन, लेकुरवाळ्या, ब्राह्मणेतर, प्राथमिक शाळेत शिकवत असलेल्या स्त्रीच्या जीवनात उमटले. स्त्रीमुक्तीच्या या जागतिक वाऱ्यांनी तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. त्याची ही कहाणी.
-
Valuche Kille (वाळूचे किल्ले)
मुंबईसारख्या महानगरात वाढलेली, शिकलेली आणि नोकरी करणारी व्यक्ती जीवनाकडे एका वेगळ्या आत्मविश्वासाने बघत असते. अशा व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यातून सतत असा आत्मविश्वास व्यक्त होत असतो. मात्र जीवनात कधी तरी असे काही प्रसंग येतात, अशा काही घटना घडतात, तेव्हा स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो. जे आयुष्य आपल्या मुठीत आहे, ते आयुष्य वाळूप्रमाणे हातातून निसटत असतांना बघावे लागते. तेव्हा स्वतःच्या मर्यादांची, हतबलतेची जाणीव टोचते. अशा प्रसंगी लक्षात येते की आपल्याला वाटत होतं ते आपलं आयुष्य म्हणजे एक अजिंक्य, अभेद्य किल्ला; पण प्रत्यक्षात तो असतो एक साधा वाळूचा किल्ला! एक लाट येते आणि किल्ला वाहून जातो. जरा धारदार नजरेने बघितले तर आपल्या आजूबाजूला असे अनेक वाळूचे किल्ले दिसतील.
-
Choukat Vatoli (चौकट वाटोळी)
‘चौकट वाटोळी’ ही कादंबरी मध्यमवर्गीय जगण्याची पठडी, आशा-अपेक्षा, नैतिक-अनैतिकतेच्या धारणा केंद्रित ठेवून बदलते कौटुंबिक वास्तव कवेत घेते. एका सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार स्त्रीच्या जीवनात अपघाताने आलेला परपुरुष आणि त्यातून निर्माण झालेल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांतील गुंतागुंतीचा पट ही कादंबरी मांडते. ती मांडताना व्यक्तिगत सुख-मोह-इच्छा आणि चारित्र्य व सामाजिक प्रतिष्ठेच्या धारणांमधील संघर्ष ती अधोरेखित करते. या कथानकाला विसाव्या शतकाच्या अखेरच्या काळाची म्हणजेच जागतिकीकरण ऐन उंबरठ्यावर उभे ठाकण्याच्या काळाची पार्श्वभूमी लेखकाने खुबीने रचली आहे. एक प्रकारे आज बदलत गेलेल्या समाजाच्या पाऊलखुणा या कादंबरीत दिसतात.