-
Vardan Ragache (वरदान रागाचे)
महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88 व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण व तारुण्य दक्षिण आफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातील इंग्रजी पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करीत आहेत. ते वय वर्षे 11 ते 13 या काळात आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर व कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger', त्याचा हा मराठी अनुवाद.
-
Bhuiringani (भुईरिंगणी)
भुई रिंगिनी पुस्तक हे सदानंद देशमुख ह्यांचे दुसरे पुस्तक आहे जे कि मी वाचले आहे. आणि पुस्तकाच्या सुरवातीला मला वाटले मी नक्की काय वाचत आहे पण जसे पुस्तक पुढे सरकत जाते तसे आपल्याला कळत जाते कि देशमुख हे खरंच जबरदस्त ताकतीचा लेखक आहेत. त्यांचे पहिले पुस्तक जे मी वाचले ते म्हणज़े बारोमास ज्याच्या मध्ये एका शेतकऱ्याची कशी कुचंबणा होत जाते ते त्यांनी दाखवले आहे. ह्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत. पुस्तकाचा आवाका खूप मोठा आहे. पदोपदी आपल्याला ही जाणीव होते की स्वतः देशमुख ह्यांचे नाते भुईशी किती खोल आहे. पुस्तकाचा गाभा हा आहे कि भारतीय पारंपरिक शेती जी होती तिचे नाते निसर्गाशी खूप घट्ट होते. पारंपरिक शेती मधले घटक परस्परावर खूप अवलंबून होते. शेतीचा प्रत्येक घटक ग्रामीण भागात साजरा केला जायचा पण जसे आपण पारंपरिक शेती पासून लांब झालो तसे गावाला बकालपणा तर आलाच पण शेतकर्याचे संकटे पण वाढत गेली. ह्या पुस्तकाची समीक्षा लिहणे खरंच खूप अवघड आहे कारण पुस्तका मध्ये इतक्या गोष्टींचा विचार केलेला आहे कि ज्याला शेतिविषेय कळवळ आहे त्यांनी हे पुस्तक खरंच एकदा वाचले पाहिजे.
-
Bharat Ek Pahani (भारत एक पहाणी)
भारतविषयक सखोल व परिपूर्ण माहिती देणारा मराठी भाषेतील हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. सन १९९५ पासून प्रकाशित होणाऱ्या ' भारत एक पाहणी या वार्षिकात भारताविषयीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक, शेतीविषयक आणि शिक्षण, संरक्षण, परराष्ट्रीय संबंध, प्रशासकीय व्यवस्था, शासकीय योजना याची सर्व माहिती येथे एकत्रित दिली आहे. विदयापीठय अभ्यासक्रमातील सामाजिक शास्त्रे, पत्रकारिता, संशोधन या बरोबरच सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांकरिता आवश्यक माहितीसह आकडेवारी या पुस्तकात दिली आहे.
-
Eka Maleche Mani (एका माळेचे मणी)
एका माळेचे मणी या पुस्तकातील प्रारंभी मीर हुसेन किरमानी याने लिहिलेल्या टिपू सुलतानाच्या चरित्राचे मराठी भाषांतर आहे. मुस्लीम आक्रमणाचा हा एक मणी बाकीचे मणी म्हणजे जिना, भुत्तो, झिया-उल-हक अशा कट्टर मुस्लीम लोकांबद्दल सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेले लेख आहेत.
-
Brahmashrichi Smaran Yatra (ब्रह्मर्षीची स्मरण यात
समाधीमध्ये मंगळ, गुरु, शनि या ग्रहांवर विज्ञानमय कोषाने जाऊन तेथील स्थिती अगोदर प्रसिध्द केली व ती अवकाश यानांनी मानल्यामुळे जागतिक कीर्ति लाभलेले, दिव्य दृष्टी असलेले साक्षात्कारी संत. प्राचीन भारतीय विद्यांचे संशोधक म्हणून भारतात मान्यता पावलेले. "स्वयंभू" ग्रंथाने धूर्त, मुत्सद्दी भीम व महाभारताची ऎतिहासिकता सिध्द करणारे व ज्योतिर्गणिताने तारखा ठरविणारे. "वास्तव रामायण" ग्रंथात पंधरा सहस्त्र वर्षांचा इतिहास मांडून रामाच्या जीवनातील तारखा ज्योतिर्गणिताने सिध्द करणारे. उपनिषदे, पातंजल योग व गीता यावरील विज्ञाननिष्ठ निरुपणे प्रकाशून अध्यात्मिक अधिकार सिध्द करणारे. "पुनर्जन्म"- या ग्रंथातून त्या सिध्दान्ताची वैज्ञानिक मांडणी करणारे. ख्रिस्ताचे हिंदुत्व, प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे, ‘स्वा. सावरकर - मूर्तिमंत गीता, पहिले नि एकमेव’, ‘दास मारूती ? नव्हे; वीर हनुमान !’ वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, संगीत दमयंती परित्याग, युगपुरूष श्रीकृष्ण, तेजस्विनी द्रौपदी अशी सुरस १६ पुस्तके लिहून जगापुढे सत्य मांडणारे. पुण्यातील प्रथितयश सर्जन डॉ. प. वि. वर्तक यांच्या सिध्दहस्त लेखणीतून ५२ वर्षांच्या अध्यात्मसाधनेचे अनुभव अक्षरबध्द झालेले आत्मचरित्र ‘ब्रम्हर्षीची स्मरणयात्रा’.
-
Hridam King O.P.Nayyer (ह्रीदम किंग ओ.पि.नय्यर)
ओ. पी. नय्यर हे हिंदी चित्रपट संगीतातील अविस्मरणीय नाव. स्वप्नील श्रीकांत पोरे यांनी या पुस्तकात नय्यर यांच्या संगीत कारकिर्दीचा वेधक आढावा घेतला आहे. सोळा प्रकरणामध्ये ओपींची वाटचाल, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे; तसेच त्यांनी ज्या गायक-गायिकांबरोबर काम केले त्याबद्दल पोरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आशा भोसले आणि ओ. पी. नय्यर हे समीकरण कसं आणि किती यशस्वी झालं होतं, ते येथे तपशीलानं त्यांनी दिलं आहे. ओपींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या शेवटच्या टप्प्याबद्दलही या पुस्तकात रंजक माहिती आहे.
-
Neharu Mithak Aani Satya (नेहरू मिथक आणि सत्य)
पं. जवाहरलाल नेहरूंची जीवनकथा ही भारतीय स्वातंत्र्यलढ्याची आणि स्वतंत्र भारताच्या पुनर्निर्माणाची एक विराट गाथा आहे. युगायुगांपासून आलेलं तुटलेपण आणि परकीय गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर भारत ज्या विचारांच्या बळावर आपलं पाऊल घट्ट रोवून उभा राहिला आणि ज्या विचारांमुळे त्याचं स्वातंत्र्य सुनिश्चित झालं, त्याचप्रमाणे त्याच्या आधुनिकतेला आणि विकासाला ठोस मार्ग उपलब्ध करून दिला, ते विचार पं. जवाहरलाल नेहरू यांचे होते. या विचारांवर मानवमुक्तीची वैश्विक परंपरा आणि भारतीय चिंतनाचा सखोल प्रभाव होता. त्यांच्या जीवन-संघर्षानं त्यांच्या विचारांना आकार आला होता, भारताप्रती संपूर्ण समर्पण आणि सच्च्या प्रेमानं त्यांच्या विचारांना शक्ती दिली होती. बघता बघता पं. नेहरूंबद्दल असत्य आणि संभ्रमाचा एक विराट ढीग रचला गेला, ही खरोखरच एक दुर्दैवाची बाब आहे.
-
Gonidanchi Durgchitre (गोनीदांची दुर्गचित्रे)
शिकण्याला वयाची मर्यादा नसते, असं म्हणतात. सृजनशील लेखक आणि दरयाखोऱ्या पिंजून काढणारे दुर्गप्रेमी गो. नी. दांडेकर यांनी हे सिद्ध केलं आहे. वयाच्या चाळीशीनंतर कॅमेऱ्याचं तंत्र समजावून घेऊन कुशल छायाचित्रकार म्हणून त्यांनी निसर्गाला कॅमेराबंद केलं. त्यांनी काढलेल्या दुर्गाचित्रांचा हा अनोखा संग्रह. शिवनेरी, पुरंदर, तुंग, लोहगड, राजगड, रायगड, यांसारख्या किल्ल्यांबरोबरच त्या किल्ल्यांवरील मंदिरं, गुहा, माची अशा चहुबाजूंनी त्यांनी तो गड न्याहाळलेला दिसतो. शिवाय वेंगुर्ल्यासारखे बंदर, पैठणसारखं तीर्थक्षेत्र, कैलासलेणी, जेजुरीच्या खंडोबाचं देऊळ आदि ठिकाणं कॅमेराबंद झाली आहेत. परिसर जिवंत करणारी, ही कृष्णधवल छायाचित्र इतिहासाची साक्ष देतात. त्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देतात. 'गोनीदां'च्या नजरेतून ही दुर्गायात्राच घडते.अग्रगण्य कादंबरीकार आणि दुर्गभ्रमणकार दिवंगत गो. नी. दांडेकर यांनी काढलेल्या छायाचित्रांचे हे संकलन. वीणा देव यांनी संकलन आणि संपादन केलेल्या या पुस्तकात "गोनीदां'नी काढलेली विविध किल्ल्यांची छायाचित्रे आहेत. राज्यातील प्रत्येक किल्ल्याला भेटी देऊन गोनीदांनी काढलेले हे फोटो या किल्ल्याचे वैभव सांगतात. पंचवीस वर्षांच्या दुर्गभ्रमंतीच्या कालखंडात त्यांनी अनेक ठिकाणे टिपली. ही सगळी छायाचित्रे म्हणजे राज्यातील गडकिल्ल्यांची सफरच आहे. प्रत्येक छायाचित्राखालच्या ओळी त्या परिसराची नेमकी माहिती देतात. या छायाचित्रांपैकी काही छायाचित्रांत असलेल्या वास्तू आता नाहीशा झाल्या आहेत. एका अर्थाने ही छायाचित्रे त्या वैभवाची साक्ष देणारे पुरावेच आहेत. "गोनीदां'नी छायाचित्रण कलेतही प्रावीण्य मिळवले होते, याची प्रचिती ही छायाचित्रे देतात. या छायाचित्रांमुळे शिवकाळच जागा होतो. ही छायाचित्रे पाहून ही ठिकाणे बघायलाच हवीत, अशी इच्छा होते.
-
Marathyanchya Dakshinetil Paulkhuna (मराठ्यांच्या
श्री शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात दक्षिण मार्तात मराठ्यांच्या घडलेल्या घडामोडी व त्यांचे आजचे अस्तित्व यांचा संशोधनात्मक मागोवा. दक्षिण भारतात मराठ्यानी बांधलेले किल्ले, निर्माण केलेल्या राजधान्या, वसवलेली गावे, त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी शहरे, मराठ्यांच्या दक्षिणेत झालेल्या लढाया, त्यांच्यावर आधारित शिलालेख, मराठ्यांची समाधी स्थळे अशा अनेक प्रकारची संशोधनात्मक माहिती आपल्याला या या म मधून वाचायला मिळणार आहे. दक्षिण भारताकडे गेल्या काही वर्षात पर्यटक व इतिहास प्रेमींचा ओढा वाढलेला आहे. परंतु सर्वात मोठा प्रश्न असतो तो तिथे जाऊन नक्की काय पहावे, भाषा आणि भूगोल या अडचणींवर मात करता येऊन जास्तीत जास्त किल्ले, मंदिरे, समध्या, शिल्पे, राजवाडे, राजधान्या इ. अभ्यासता यावीत म्हणून इतिहास आणि भूगोलाची सांगड घालून दक्षिण भारतात विखुरलेली मराठ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा वाचकांच्या भेटीस आणत आहे.
-
Ek Bhakar Teen Chuli (एक भाकर तीन चुली)
एक भाकर तीन चुली’ संकटांतून धीराने मार्ग काढणारी आणि गरिबीशी वाघिणीसारखी लढणारी स्त्री ह्या कादंबरीची नायिका आहे. गाव-खेड्यातील शेतकरी व शेतमजूर स्त्रियांच्या वाट्याला आलेले बेसुमार कष्ट आणि त्यांची हिंमत हा कादंबरीचा गाभा आहे. तिची व्यथा, तिची वेदना, तिचा संघर्ष, या कादंबरीत अनुभवता येईल. नाळ तोडायच्या आधीपासून ते चितेपर्यंत, ज्या स्त्रियांंच्या वाट्याला संघर्ष आला, तरीही ती न हारता न डगमगता लढत राहिली अशा जगातल्या सगळ्याच स्त्रियांना ही कादंबरी समर्पित…
-
Anand Janmala (आनंद जन्माला)
मुकुंद आणि सुनंदाची भेट झाली ‘संततिनियमन करावे की नाही?’ या परिसंवादाच्या निमित्ताने. मग त्यांचं लग्न होतं. त्यांच्या संसारवेलीवर अरुणच्या रूपाने गोंडस फूल उमलतं. अरुणच्या जन्मानंतर मुकुंद मूल न होण्याची शस्त्रक्रिया करून घेतो; पण सुनंदाला पुन्हा दिवस गेले असल्याची चाहूल लागते आणि मुकुंदा हैराण होतो. सुनंदाच्या चारित्र्यावर शंका उत्पन्न करणारी परिस्थिती निर्माण होते. त्याचा पुण्यात बदलून आलेला मावसभाऊ गोविंदा त्याच्या अनुपस्थितीत सुनंदाशी गप्पा मारायला येत असल्याचं, त्याच्या लक्षात आलेलं असतं. गोविंदाला खरं म्हणजे सुनंदाशी लग्न करायचं असतं; परंतु मुकुंदाने तिला मागणी घातल्यावर आपला विचार बदलून गोविंदा दुसर्या गावी निघून गेलेला असतो. मुकुंदाने सुनंदाला मागणी घालण्यापूर्वी तिलाही तो पसंत होता, असं सुनंदाने म्हटल्याचं मुकुंदाला आठवत असतं. त्यांच्या सुखी संसारात संशयासुराने प्रवेश केलेला असतो... काय होतं पुढे? मुकुंद आणि सुनंदाच्या भावांदोलनांची कहाणी.
-
Rigeta (रिगेटा)
या कथासंग्रहातील ‘घाणेरीचं फूल’ कथेतील सवर्ण चित्रकार दलित मुलीशी प्रतारणा करून परदेशी मुलीशी लग्न करतो आणि ती दलित मुलगी आत्महत्या करते. ‘तोडगा’ मधील सुमार रूपाच्या सुनंदाचं लग्न लागत असताना मांडवातच तिचा नवरा मरण पावतो आणि त्यानंतर लग्नाआधी तिच्यावर मोहित झालेल्या बापूंनी तिला लिहिलेलं पत्र ती वाचते आणि तिच्या उजाड जीवनात ते पत्र ‘ओअॅसिस’ आणतं. ‘जखम’ कथेतील चाळिशी उलटलेल्या, संसार उत्तम तर्हेने मार्गी लागलेल्या सुमतीचा कॉलेजमधील मित्र प्रभाकर तिच्या घरी येतो. सुमतीने आणि त्याने एकत्र घालवलेल्या उत्कट प्रेमाच्या क्षणांचं स्मरण तो तिला देऊ पाहतो. ‘देणं’ या कथेत ईव्हा या स्वैर परदेशी तरुणीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती (विशेषत: स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबतीत) आणि पाश्चात्त्य संस्कृतीची तुलना भारतीय लेखकाच्या मनात येते. मानवी जीवनातील योगायोग, नियती, मानवी मन, स्त्री-पुरुष, कला आणि जीवन या कोलाजमधून साकारलेल्या वाचनीय कथांचा संग्रह.
-
Padchaya (पडछाया)
‘सौभाग्य’ या कथेतून डॉ.सोहनी गिनीपिग प्रयोग करतात. ‘विद्या विनयेन शोभते’ मधून ‘मेकॅनिकल ट्यूटर’– कॉम्प्युटरच्या साह्याने मेंदूत ज्ञान भरण्याचा शोध लावतात. ज्ञानग्रहण करणार्या पेशी उत्तेजित करून मेंदूपेशीत टेपरेकॉर्डरप्रमाणे ज्ञान रेकॉर्ड होते.या भोवती हे कथानक फिरते. ‘ऐलमा पैलमा’ या कथेतून दत्तक घेतलेल्या ईशाच्या मानेला गाठ असल्याचे समजते... ही फसवणूकच असते, नीताला याचा त्रास होतो. प्रभाकर यंत्रमानव नंदिनीला घरी आणतो. ती सर्वांना शेकहॅण्ड करते. यावेळी सर्वांना ईशाची खूप आठवण येते.मग पुन्हा ईशाला दत्तक म्हणून सांभाळण्याचा निर्णय होतो. ‘एका यंत्र मानवाची डायरी’ या कथेत स्वार्थी रमेश संपत्तीसाठी मोठ्या भावाचा खून करतो,हे रोबो पाहतो व स्वत;शीच म्हणतो,‘यंत्रमानवाला नाती नाहीत ते किती बरं आहे.मानवाची निरपेक्ष सेवा करणे,हेच यंत्रमानवाचे व्रत आहे.’ ‘तो मी नव्हेच!’ या कथेतील अभिनेता- हनुमंत बाप्या कोरेगावकर ‘बहारकुमार’ नावाने फिल्मी दुनियेत प्रवेश करतो. एके दिवशी त्याची प्रामाणिक, हुशार व शास्त्रज्ञ मित्र संजयशी भेट होते. हनुमंत आजारी असतो. पण तो संजयला माझ्याऐवजी माझा क्लोन इंडस्ट्रीत पाठव,असं सांगतो. संजयला या खोट्या प्रकाराची कल्पनाच नसते. हा क्लोन ‘बहारकुमार’ म्हणून वावरतो. सर्वांनाच फसवून माणुसकीला काळिमा फासून,‘तो मी नव्हेच!’ म्हणून तो जगतो. ‘पडछाया’, ‘मृत्यू,’ ‘सत्य आणि मिथ्य’ या व इतर वैज्ञानिक कथा वाचकांना आधुनिक विज्ञानाची ज्ञानसमृद्धतेची वाट दाखविणार्या.
-
The Secret Friend (द सीक्रेट फ्रेन्ड)
बोस्टन बंदरात एक मृतदेह सापडतो. डार्बी मॅकार्मिक करत असलेल्या दोन खुनांच्या तपासाशी याचा संबंध असतो. या गुन्ह्यात एक चक्रावणारी गोष्ट असते, ती म्हणजे मृतदेहांसोबत आढळलेली व्हर्जिन मेरीची छोटी मूर्ती. आणखी एका मुलीच्या अपहरणानं हे रहस्य आणखी भयावह होतं. सगळे धागे आधीच्या खुनांशी जुळतात. आणि डार्बीचा शोध आणखी गुंतागुंतीचा होतो. ख्रिस मुनी यांचं हे सायकोथिलर पुस्तक पानागणिक शहारे आणतं. आणि डार्बीसोबत वाचणाराही पुस्तकाच्या अखेरपर्यंत खुन्याच्या शोधात गुंतून राहतो.
-
Junglee Kulguruchi Jangi Katha (जंगली कुलगुरूची जं
कोप्पळ जिल्ह्यातल्या अळवंडी या कुग्रामातील यंकप्पा रामोशी यांचा तेजस्वी हा मुलगा. गदगच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळाल्याने, तिथे चोरून वर्षभर रहाणारा, आठवी पास होईपर्यंत म्हशी राखत फिरणारा, शेण गोळा करत, शेंगा चोरत फिरणारा, हा मुलगा इंदिरा गांधी राष्ट्रीय अदिवासी विश्वविद्यालयाचा कुलगुरू होतो, उत्तम बांधणी करत विद्यापीठ प्रगतीपथावर नेतो आणि विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कीर्ती व सन्मान मिळवून देतो. त्या मुलाची आत्मकथा म्हणजेच हे पुस्तक. डॉ. कट्टीमनी यांचं जीवन म्हणजे शून्यातून सिंहासन निर्माण करणाऱ्याच्या कथेचं रूपक आहे. जातीयवादाची बजबजपुरी आणि मुलभूत सुविधांचा अभाव अशा कात्रीत अडकलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय अदिवासी विश्वविद्यापीठाला डॉ.कट्टीमनींच्या रुपाने एक भाग्यविधाता लाभला. पदभार स्वीकारताच त्यांनी विद्यापीठातील रुळलेल्या उदासीन वाटा नाकारत कायापालट सुरू केला. आणि अवघ्या काही काळात आपल्या साध्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यांचा हा विलक्षण प्रवास देशातील शिक्षण व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. हा प्रवास या पुस्तकाच्या पानापानातून वाचकांसमोर उलगडत जातो.
-
Bhartachya Las Nirmititil Pragatichi Goshta (भारता
"पाश्चिमात्य लोकांनी १७९६ साली लसींचा शोध लावला, त्याच्याही आधीच्या काही शतकांपासून भारतीय लोक ‘लस` टोचण्यात तरबेज होते. ‘भारताच्या लस-निर्मितीतील प्रगतीची गोष्ट’ हे पुस्तक एडवर्ड जेन्नर यांच्या काळापासून ते कोविड-१९ साथीपर्यंतच्या लसींच्या प्रवासाचा आलेख उलगडून दाखवते; ज्यात लसींच्या बाबतीतल्या भारतीय दृष्टिकोनापासून ते जागतिक दृष्टिकोनापर्यंत, लसींचे अनेक पैलू समाविष्ट आहेत. लस नेतृत्व, लसींच्या बाबतीतला राष्ट्रवाद, लस घेण्याबाबतची अनिश्चितता, उत्सुकता आणि नि:पक्षपात, तसेच अगदी अलीकडची ‘राजनैतिक चलन` ठरलेली ‘लस-मैत्री`, या सगळ्या गोष्टींचा उहापोह तर या पुस्तकात केलेला आहेच, पण त्याचबरोबर, जगातली सर्वांत मोठी व्यापक अशी लसीकरण मोहीम राबवताना भारताने जे अगदी बारकाईने विचार करून काळजीपूर्वक आणि काटेकोर असे लक्षवेधक नियोजन केले होते, त्यांची संपूर्ण माहिती हे पुस्तक वाचकांना करून देते."