-
Shrimant Peshwe (श्रीमंत पेशवे )
अटकेपार भगवा झेंडा फडकविणाऱ्या पेशव्यांची शौर्यगाथा "श्रीमंत पेशवे' या पुस्तकात लक्ष्मण सुर्यभान यांनी रेखाटली आहे. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे, श्रीमंत बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, दुसरे बाजीराव पेशवे यांच्याविषयी लेखकाने उत्कटपणे लिहिले आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचा शूरपणा, धाडसीपणा याचबरोबर मस्तानीबरोबरचे प्रेमसंबंध लेखकाने उत्तमरीत्या फुलवले आहेत. प्रवाही भाषाशैली व जमून गेलेले प्रसंग यामुळे या पुस्तकाने एक वेगळी उंची गाठली आहे, यात शंका नाही.
-
Filar (फिलर)
"कुणाला म्हणतेस ग मूर्ख ? आरसा बोलू लागला होता. कुणाला म्हणतेस गं मूर्ख ? तुझ्या मध्यमवर्गीय चौकटीतून बाहेर येण्याचा कधी प्रयत्न केलास ? शिकलीस, डीगऱ्या मिळवल्यास पण या चौकटीत स्वतः ला बंदिस्त करताना डोकं उंबऱ्याबाहेरच ठेवून आलीस. कशाची मिजास करणार आहेस ? कशाचा तोरा मिरवणार आहेस ? बाई गं बंड करायचं तर हात पाय मोकळे लागतात , जिभेला बोलता यावं लागतं. डोळ्यांना राग यावा लागतो. नीती अनीतीचे जुने धडे गिरवून नीतिमान होता येत नाही. नीती आतून यावी लागते. प्राणांतून जिचा हुंकार येतो ती नीती. परंपरागत चालत आलेले पाढे बे एके बे म्हणजे नितीनियामांचा गुणाकार नाही. प्रत्येक भावनेला भक्तीचा मुलामा द्यायचा. प्रत्येक विचाराला अध्यात्माचा रंग चढवायचा. यानं काहीही साधत नाही …" फिलर मधून
-
Hindu (हिंदू)
कित्येक शतकांपूर्वी सिंधु नदीच्या तीरावर आर्यांच्या आगमनाबरोबर एका संस्कृतीची पाळेमुळे रुजली. आणि नंतरच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात 'हिंदू संस्कृतीची' म्हणून ती अनेक अंगांनी बहरली. वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्त्विक विचारधारांमुळे यात नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. संस्कृतीची मूळ बैठक कायम राहिली तरी येणारी प्रत्येक नवीन विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली आणि रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, चालीरीती, कुटुंबव्यवस्था, परस्पर नातेसंबंध यांचा एक पट निर्माण होत गेला. शतकानुशतके या संस्कृतीने माणसांचे अवघे जीवन व्यापून टाकले. या संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते. म्हणूनच ही 'जगण्याची समृद्ध अडगळ' असे नेमाडे यांनी म्हटले आहे. या 'समृद्ध अडगळीचे' चकित करून सोडणारे सुरम्य दर्शन 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीतून घडते. जीवनाची व्यापकता, व्यामिश्रता यांचे दर्शन घडवणे जसे महाकाव्याकडून अपेक्षित आहे तसेच ते कादंबरीकडूनही अपेक्षित असते. 'कोसला' आणि नंतरच्या 'चांगदेव चतुष्टय' मधल्या 'बिढार', 'हूल', 'जरीला', 'झूल' प्रमाणेच ही कादंबरीदेखील ही अपेक्षा पूर्ण करते. आणि 'हिंदू चतुष्टया' तील पुढच्या प्रत्येक कादंबरीविषयची उत्सुकता निर्माण करते. वाचनाचे समाधान देतानाच वाचकाला जीवनाच्या अनेक अंगांचा नव्याने विचार करायला लावण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे. मुखपृष्ठावरचे सुभाष अवचट यांचे उत्कृष्ट पेंटिंग, पुठ्ठा बांधणी, उत्तम छपाई ही या कादंबरीची बाह्य वैशिष्ट्ये म्हणता येतील.