-
Prateeksha (प्रतीक्षा)
अनाथाश्रमातली एक पाच वर्षांची मुलगी दत्तक जाते. तिच्या बालपणीच्या खुणा पुसल्या गेल्या आहेत. ती जसजशी मोठी होत जाते तशी आपलं बालपण शोधू लागते. हे बालपण खेळ, खाऊ एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर आपण कोण, कुठच्या, आई-वडील कोण, त्यांनी आपला त्याग का केला? त्याग केला की आपण हरवलो ? हरवल्या असू तर शोध घेतला गेला का? नसेल तर का? एका मूळ समस्येतून निर्माण झालेले अनेक प्रश्न- उपप्रश्न. हा सगळा शोध तिच्या एकटीचाच आहे. त्यांची उत्तरं शोधण्यासाठी तिनं केलेली धडपड, ती आणि तिची मनस्वी वृत्ती, ती आणि तिची वेदना, ती आणि तिला हुलकावणी देणारं तिचं बालपण यांची ही कहाणी आहे. या सर्वांतून या कादंबरीचे धागेदोरे विणले आहेत. - गिरिजा कीर
-
Nandini (नंदिनी)
नंदिनी, समाजाने आखून दिलेल्या नातेसंबधाची चौकट ओलांडत, जे गमावलंय ते मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. आयुष्यातील दोन घटनांच्या दरम्यान घडणाऱ्या एका स्त्रीची भावनिक, आर्थिक, शारिरीक आंदोलने मोठ्या तरलतेने कादंबरीत टिपलेली आहेत. इथे एका बाजूला आईचे मुलीसाठी तुटणारे काळीज दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला तीच आई तिच्या आवडत्या माणसाच्या प्रेमासाठी होरपळताना दिसत आहे. व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे काय... स्त्रीचे स्वतंत्र असे काही अस्तित्व असते का? तिला प्रेम करण्याचा हक्क असतो का...? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कांदबरीत लेखिका शोधत आहे. मराठी कादंबरीविश्वातील स्त्रीवादी विचारांचा प्रवास 'कळ्यांचे निश्वास' पासून 'भिन्न' कादंबरीपर्यंत पोहचला आहे. या प्रवासातील एक पुढचे आशादायी वळण म्हणजे शिल्पा गंजी यांची 'नंदिनी' ही कादंबरी आहे. -शिल्पा कांबळे (लेखिका आणि पटकथाकार)
-
Maharana Pratap Ajey Yodha (महाराणा प्रताप अजेय यो
ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आणि त्याबरोबरच मेवाडी दंतकथा, नोककथा यांच्या आधारावर लिहिण्यात आलेलं, एका अत्यंत महान भारतीय नायकाचं चरित्र. हे सुबोध, सुगम लेखन वाचकांना मंत्रमुग्ध करतं आणि खिळवून ठेवतं. 'सन १५७६ च्या हळदीघाटीच्या प्रसिद्ध लढाईचं वर्णन करताना कुठेही सहानुभूतीनं ओथंबलेलं किंवा पूर्वग्रहदूषित लेखन न करता, राणा प्रतापशी निगडीत असलेल्या अनेक परीकथा दूर सारून अत्यंत प्रामाणिकपणे वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे.' - फ्रंटलाईन 'एका व्यापक ऐतिहासिक चौकटीच्या सादरीकरणातून, महाराणा आणि अकबर या कट्टर शत्रूच्या मनात परस्परांविषयी कितीही शत्रुत्व असलं तरी त्यांना एकमेकांविषयी आदरही होता, हे दाखवून देण्यात आलं आहे.' - स्टेट्समन
-
Plague (प्लेग)
आजाराची साथ ही युद्धासारखी खवीस नाही. अशा परिस्थितीत चांगलं म्हणजे काय ? दैव म्हणजे काय ? मानव कुणाला म्हणायचं ? जेव्हा मृत्यू अनपेक्षित असतो तेव्हा त्याला सामोरं जाणं म्हणजे का वीरगती ? मृत्यूची वाट पाहणं म्हणजे का वीरगती? मृत्यूची वाट पाहणं हा विचार करत राहाणं, किंवा मृत्युमुखी पडणाऱ्या कुणाला मदत करणं, ही वीरगति ? मृत्यू हा अटळ आहे. पण जेव्हा सगळ्यांचं जीवनच धोक्यात आहे तेव्हा ह्या अटळपणाचं काय करायचं ? साथीच्या काळात नैसर्गिक मृत्यू येणं म्हणजे काय? आपण आज वाचलो ह्याची बढाई मारायची की ती आपल्याला काही करायची संधी मिळाली आहे असं मानायचं आणि काही करायचं ? ज्या साथीनं मानवी जीवनालाच धोक्यात टाकलंय ती साथच मानवी निष्काळजीपणाने येत असेल तर? म्हणजे ती कधी परत येईल ते सांगता येणार नाही. मग काय करायचं ? मानवाचे मानवाशी संबंध, मानवाचे देवाबरोबरचे संबंध, मानवाचे स्वतःबरोबरचे संबंध ! मृत्यू अटळ आहे हे एक सार्वत्रिक सत्य आहे. आणि ते तितकंच कठोर, आपल्या समोर उभं ठाकलेलं आहे. ते अदृश्य नाही. ते अटळ नाही. आपण अगोदरच मेलो नाही ह्याबद्दल हर्षोल्हास मानायचा की आपल्याला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग करायचा. हा काम्यूचा संदेश अत्यत सोप्या शब्दात, सर्वांना समजेल इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा काम्यूची हातखंडा कादंबरी, मराठीत थेट फ्रेंचमधून.
-
Mahamaya (महामाया)
महामाया' या पुस्तकात मराठी संतांच्या भारुडांतील कैकाय आणि तंजावरी परंपरेत रचल्या गेलेल्या कुरवंजी नाटकांतील कैकाडीण यांचे आत्मरहस्य सामाजिक दृष्टीने उकलले आहे; तसेच, अभिजनांच्या परंपरेने रंजन आणि प्रबोधन यांसाठी जिचे महामाया-रूप गौरविले आहे, त्या स्त्रीच्या आणि तिच्या प्रजेच्या दीर्घकालीन दुरवस्थेचे भेदक दर्शन घडविले आहे. मराठी संतांची कैकायविषयक भारुडे आणि तंजावरच्या मराठी राजपुरुषांची कुरवंजी नाटके यांच्या सर्वांगीण आकलनाच्या निमित्ताने, संपूर्ण दक्षिण भारतातील समाज, धर्म आणि कला यांच्या परस्परसंबंधांच्या अभ्यासाचा एक वस्तुपाठच या पुस्तकातील शोधसहयोगातून प्रकट झालेला आहे. दक्षिणेतील धर्मेतिहास आणि नाट्येतिहास यांचे अंतःसंबंध हळुवारपणे उलगडताना डॉ. रा. चिं. ढेरे आणि डॉ. तारा भवाळकर या साक्षेपी अभ्यासकांनी, सामाजिक दृष्टीने धर्म-कलादींची समीक्षा करणाऱ्या विचारकांसाठी शोधाच्या कितीतरी नव्या वाटा उजळल्या आहेत; आणि भटक्या-विमुक्तांच्या उत्थानाच्या चळवळीत अग्रेसर होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अस्मितापोषक विचारपाथेय दिले आहे.
-
Bhalchandra Nemade Sahityavichar Aani Kadambarya
भालचंद्र नेमाडे यांच्या प्रातिभ निर्मितीचा आणि साहित्यविचाराचा असलेला अतूट संबंध शोधण्याचा मौलिक प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. नेमाडे यांनी मांडलेल्या वास्तववाद, नैतिकता, बांधिलकी आणि देशीवाद या संकल्पनांचे त्यांच्याच कादंबऱ्यांत उपयोजन आहे. त्यांचा साहित्यविचार व त्यांची कादंबरी सामाजिक वास्तवावर भर देते, वसाहतवादी ज्ञानशाखांना छेद देते; तसेच समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्राकडे आणि संस्कृती विडंबनाकडून संस्कृती स्वीकाराकडे जाताना दिसते- असे या संशोधनाचे सार आहे. नेमाडे मानवी लैंगिकता, संस्कृती, इतिहास यांना नैतिक कसोटी लावतात. बांधिलकीच्या भूमिकेतून जाती-पोटजातींच्या अंत:स्तरावरील मूल्यव्यवस्था, सौंदर्यकल्पना साकारतात. भाषिक कृती करत संस्कृती, परंपरा, मूल्ये आणि प्रदेश, परिसरनिष्ठा, मानवी जाणिवा यांचे सांस्कृतिक आकलन मांडतात. व्यक्तीच्या प्रेरणा, त्याचे जगणे, सृष्टी यांचा मानववंशशास्त्रीय शोध घेतात- अशी या संशोधनाची मांडणी आहे. याशिवाय नेमाडे यांच्यातील सर्जनशील लेखकाने आपली निर्मितिप्रक्रिया साहित्यविचाराच्या चौकटीत कशी कोंबली नाही, हे या ग्रंथात उलगडून दाखवताना संशोधकाने नेमाडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्या गदारोळात कमालीची तटस्थता दाखवली आहे. भालचंद्र नेमाडे यांच्या समीक्षेचा आणि त्यांच्या सर्जनशील निर्मितीचा तटस्थपणे शोध घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांना हा ग्रंथ नक्कीच आश्वासक ठरणार आहे.
-
Kathasetu (कथासेतू)
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही प्रांतांची आपापली वेगळी भाषा असली तरी त्यांच्या लोकजीवनात काही अंशी साम्यही आहे आणि म्हणूनच मराठी आणि गुजराती भाषांना 'भाषा-भगिनी' म्हणणे उचित ठरेल. भारतीय भाषांतील साहित्याचे अभिसरण होत राहावे, भारतीय संस्कृतीचा सामायिक वारसा जपण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न व्हावेत, त्यासाठी भारतीय भाषांचे आपापसात अनुवाद होऊन भाषा-भगिनींच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळावी, यासाठी 'आंतरभारती' ही संकल्पना अस्तित्वात आली. 'कथासेतू' या कथासंग्रहाद्वारे गुजराती भाषेतील काही ख्यातनाम साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध होत आहेत. या निमित्ताने गुजराती भाषेतील जुन्या-नव्या सुप्रसिद्ध एकवीस साहित्यिकांच्या लक्षणीय साहित्यकृतींचा आस्वाद मराठी वाचकांना मिळणार आहे.
-
Sahabandha:Eka Dnyanopasakashi (सहबंध : एका ज्ञानो
कंपनीतली सुस्थिर नोकरी सोडून बेभरवशाच्या प्रकाशन-व्यवसायात उतरण्याचा धोका पत्करलेले अरुण जाखडे यांनी साधारण १९९५च्या मध्याला डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याकडे पुस्तकांची प्रकाशनासाठी मागणी केली आणि अण्णांनी ती फार साधेपणानं मान्य केली. तेव्हापासून दोघांमध्ये जो संबंध निर्माण झाला, तो केवळ लेखक-प्रकाशक एवढाच मर्यादित नव्हता. त्याला एक घरगुती गंध होता आणि तो अखेरपर्यंत तसाच राहिला. प्रकाशक म्हणून जाखडे लेखक अण्णांविषयीचा मोठाच आदर मनात बाळगून होते. त्यांनी अण्णांच्या ग्रंथांवर मनापासून प्रेम केलं. अण्णांनी लिहावं आणि जाखड्यांनी प्रसिद्ध करावं, असा सिलसिला वर्षन्वर्षं चालू राहिला. त्यांच्यासाठी प्रकाशक म्हणून हा धन्यतेचा भाग होता, पण त्याहीपलीकडे जाऊन ते माणूस म्हणून अण्णांचे स्नेहभागी झाले होते. अण्णा आणि जाखडे या दोघांमधला स्नेहभाव अकृत्रिम तर होताच, पण सर्जकही होता आणि परस्परांना एका अर्थी प्रेरकही ठरला होता. --- अरुणा ढेरे
-
Dashavatar Kala Aani Abhyas (दशावतार कला आणि अभ्य
दशावतारी खेळाकडे लोककलेचा एक प्रकार म्हणून पाहिले जाते. विशिष्ट प्रदेशातील ते एक लोकनाट्य ! हा प्रकार ग्रामीण लोकसमूहाच्या रंजनासाठी अस्तित्वात आला आणि पुढे लोकरंजनाचा एक प्रकार म्हणून त्याचा विस्तारही होत गेला. लोकरंजनाच्या या प्रयत्नात आपल्या सभोवताली जे काही सुंदर, मन मोहित करणारे, गुंगवून ठेवणारे असते, ते सारे दशावतारी कलाकार टिपत असतात. आपले भावविश्व कल्पनारम्य जगाशी जोडण्याचा ते सतत प्रयत्न करतात. त्यात मग विविध प्रकारच्या मानवी भावनाही येतात. आपल्या मनातील बऱ्यावाईट विचारांचे द्वंद्व आणि त्यातून उद्भवणारा भावकल्लोळ लोकनाट्यात परावर्तित कसा करता येईल, हा त्यांचा ध्यास ! आपली यासंदर्भातील अनुभूती लोकसमूहाप्रति कशी पोचवावी या विचारातून विजयकुमार फातर्पेकर यांनी प्रस्तुत पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यातून निर्माण झालेला दशावतारी खेळाचा अभ्यासपूर्ण असा हा विस्तृत आलेख !
-
Asa Ghadlo Mi (असा घडलो मी)*
विदर्भातील एका खेड्यात गरीब महार कुटुंबात तो जन्माला आला. खाण्याची आबाळ आणि उपचारांचा अभाव यामुळे त्या कुटुंबात मुलं जगत नसत. पण तो जगला. कधी मागते मागून मिळालेलं, तर कधी शिळंपाकं अन्न, कधी मेलेल्या गुरांचं मांस यावर तो वाढला. आईबरोबर तो शेतमजूर म्हणून कामाला जायचा. लाजिरवाणं जिणं जगत होता तो आणि त्याच्या वस्तीतील बाकीचेही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वस्तीच्या जीवनात प्रकाश पेरला. आंबेडकरांच्या विचारांनी त्याचंही घर उजळलं. तो शिकू लागला. शिष्यवृत्ती मिळत गेली आणि तो शिकत शिकत दिल्लीतील जेएनयुमध्ये पोचला. हा प्रवासही सोपा नव्हता. प्रत्येक टप्प्यावर अडथळे होते. अगणित अडचणींतून वाट काढत तो चालत राहिला आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यानं स्वतःला सिद्ध केलं. देशापरदेशात स्वतःचं अस्तित्व जाणवून दिलं. विदर्भातील एक दलित मुलगा समाजशास्त्रज्ञ होण्याचा हा रोमांचक प्रवास व्यक्तिगत उरत नाही; तो समाजाच्या खालच्या थरातील माणसांच्या जीवनसंघर्षाचा वर्णनात्मक आलेख बनतो.
-
Options Trading Handbook (ऑप्शन्स ट्रेडिंग हँडबुक)
ऑप्शन्सवर तुम्ही हजारो पुस्तकं वाचाल; पण या पुस्तकात जेवढे ज्ञान दिलेले आहे तेवढे इतर कोणत्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. सगळे लेखक तुम्हाला ऑप्शन्सची माहिती, ऑप्शन्स ग्रीक्स वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र कोणत्याही पुस्तकातून तुम्हाला ऑप्शन्स तंत्रांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते सांगितले जात नाही, ज्याद्वारे एखादा अत्यंत तुटपुंजे उत्पन्न असणारा माणूसही ऑप्शन्स ट्रेडिंग करून श्रीमंत होऊ शकेल. अद्ययावत माहिती असलेल्या या पुस्तकात ऑप्शन्सच्या बाराखडीपासून ते ऑप्शन्स ग्रीक्सपर्यंत सगळे काही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे. भारतीय स्टॉक मार्केट या विषयावर लिहिणार्या महेश कौशिक यांची पुस्तकं सर्वाधिक वाचली जातात. हेही त्यांनी लिहिलेले एक अप्रतिम पुस्तक आहे. कौशिक क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून सांगतात. हे पुस्तकदेखील त्यांनी एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात लिहिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ते वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही. एक सामान्य वेटर असलेला घिसूभाई या गोष्टीचा नायक आहे. प्रस्तुत पुस्तकात कौशिक घिसूभाईला ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकवतात याचे उत्तम सादरीकरण केलेले आहे. विज्ञान शाखेतून पदवीधर झालेल्या महेश चंद्र कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून केली होती. त्यानंतर राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारा राजस्थानमधील वाणिज्य कर विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या पदावर पाच वर्षे कार्य केल्यानंतर त्यांची नियुक्ती महसूल विभागात टी. आर. ए. पदी झाली. या पदावर त्यांनी 2001 ते 2017 पर्यंत कार्य केले. त्यानंतर त्यांना सहायक महसूल लेखा अधिकारी म्हणून बढती मिळाली. सध्या ते सिरोही येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.
-
Takiche Ghav (टाकीचे घाव)*
आयुष्य विलक्षण असतं. ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' हा अनुभव कधीही कुणालाही येऊ शकतो. त्यांना तर ऊन-पावसाच्या खेळाप्रमाणे हा अनुभव वाट्याला आला होता. जरा कुठं काही चांगलं घडतं असं वाटत असतानाच अपमानानं सन्मानित होण्याची वेळ त्यांच्यावर ओढवत होती. कित्येकदा अवहेलना वाट्याला आली. आधी कौतुक करणारी माणसंच त्यांच्या स्वार्थाला अडथळा वाटू लागताच, अचानक नालस्ती करू लागली. अशा परिस्थितीतही ते शांत राहत होते. आयुष्याची अवघी ससेहोलपट होत असतानाही, त्यांना दुःख देणाऱ्यांचेही काही वाईट होऊ नये, यासाठी ते प्रयत्नशील होते. इतरांना दोष देत नव्हते. कोणावरही राग व्यक्त होऊ नये, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये, यासाठी जपत होते. टाकीचे घाव सोसत होते. स्वतःला शांतपणे घडवत होते. टाकीचे घाव सोसतानाच्या या वेदनकळाच येथे लेखनकळा होऊन उतरल्या आहेत.
-
Marathi Natak Ani Natyasamikasha (मराठी नाटक आणि न
गेल्या दहा-बारा वर्षांत लिहिलेले माझे नाट्यविषयक लेख 'मराठी नाटक आणि नाट्यसमीक्षा' ह्या पुस्तकातून येथे सादर करीत आहे. मराठी नाट्यसमीक्षेचा विचार असे यातील बऱ्याच लेखांचे स्वरूप आहे. मराठीतील मान्यवर समीक्षकांनी केलेल्या नाट्यसमीक्षेचा काही लेखांतून परामर्श घेतला आहे. डॉ. रा. शं. वाळिंबे, प्रा. गो. म. कुलकर्णी आणि श्री. मकरंद साठे या समीक्षकांच्या नाट्यविषयक लेखनाचा स्वतंत्र लेखांतून परामर्श घेतला आहे.