-
Ruchira Part 2 (रुचिरा भाग २ )
रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २ सिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय पेहराव चढवून रुचिराच्या पद्धतीनुसार वाटीचमच्याच्या प्रमाणात सिद्ध केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. पहिल्या भागाप्रमाणेच परंतू स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवत रुचिरा - भाग २ नेही यशाच्या पायर्या वेगाने चढल्या आहेत.
-
Ruchira Part 1 (रुचिरा भाग 1)
३० वर्षात अडीच लाख प्रतींच्या विक्रमी खपाचा उच्चांक गाठणारा पाकशास्त्रावरील एकमेव अजोड ग्रंथ रुचिरा ! पाककलेचे जणू दुसरे नाव. रुचिरात बघून कोणताही पदार्थ करायला घ्यावा म्हणजे जो हमखास चांगलाच होणार ! याचे रहस्य काय ? तर रुचिरामध्ये पदार्थांच्या साहित्याचे प्रमाण तोळे-मासे ग्रॅम्समध्ये न देता खुद्द स्वयंपाकघरत प्रचलित असलल्या वाटी चमच्याच्या घरगुती मोजमापात दिलेले आहे आणि स्वत: कमलाबाईंनी हेच वाटी चमच्याचे घरगुती प्रमाण वापरून प्रत्येक पदार्थ करून पाहिलेला आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे हातचे काहीही राखून न ठेवता पदार्थाची साद्यन्त आणि सविस्तर कृती दिली आहे. काही विशेष कल्पना व वैशिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून कमलाबाईनी 'रूचिरा'चे लेखन केले आहे. शाळाकॉलेजमध्ये शिकणार्या व नव्याने संसारात पडलेल्या मुलींना स्वयंपाकाची सवय नसते. त्यासाठी रोजच्या जेवणातले तसेच इतरही साधे व सुलभ असे पुष्कळ पदार्थ रुचिरामध्ये दिले आहेत. तसेच निरनिराळ्या पाककृतींचे व इतर संबंधित विषयांचे योग्य वर्गीकरण करून व त्या त्या प्रमाणे पुस्तकाचे भाग पाडले आहेत. तसेच सजावट, मुलांना गंमत वाटेल असे पदार्थ, महाराष्ट्राबाहेरील पदार्थ, पानसुपारी विडे, संसारोपयोगी आणि व्यावहारिक उपयुक्त सूचना या महत्वाच्या व वैशिष्ट्यपूर्ण बाबींबद्दल मार्गदर्शन केले आहे. तसेच 'स्वयंपाकाला सुरवात करण्यापूर्वी' असा स्वतंत्र भाग घालून अत्यंत उपयोगी अशी वेगवेगळे पाक, मसाले, पनीर, आधुनिक साधनांची माहिती दिलेली आहे. भरपूर रेखाचित्रे, साधी व रंगीत छायाचित्रे व अकारविल्हे अनुक्रमणिका याने हा ग्रंथ सजला आहे. प्रत्येक गृहिणीच्या , क्वचित पुरूषांच्याही मदतीला सदैव तत्पर असलेला स्वयंपाकघरातला इष्ट मित्र म्हणणे रुचिरा ग्रंथ.
-
Pasang (पासंग)
"पासंगालाही पुरत नाही" या अर्थाची म्हण मराठीत आहे. 'क्षुल्लक' या अर्थाने ती वापरली जाते. तराजूच्या दांड्याला दोन तागडी समतोल रहावीत, म्हणून जे छोटेसे वजन लावले जाते, ते म्हणजे 'पासंग'. आंबेडकरी चळवळीत कळू लागल्यापासून ऐकत आलो आहे, की दलितांचे राजकारण हे पासंगाचे राजकारण आहे. याचा अर्थ असा की, समाज समतोल ठेवायचा असेल, तर दलितांनी पासंगासारखे राहावयास हवे. समाजाचे एकारलेपण दलितांमुळेच समतोल होऊ शकते, हा बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार होता. अनेक 'पासंगात' जातीधर्मनिरपेक्ष अशा अनेक घटना आणि व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. केवळ दलितांचे, त्यांच्या चळवळीचे उदात्तीकरण केले नाही, तर त्यांच्या चळवळीवर कठोर आघातही केले आहेत. समाजाच्या सर्व थरात ज्या घटना किंवा व्यक्ती 'फूटनोट' म्हणून आजवर दुर्लक्षित ठेवण्यात आल्या, त्यांचा शोध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
-
Tarphula (टारफुला)
...टारफुला ही या प्रवृत्तीची आणखी एक अप्रतिम कादंबरी आहे. हिचे आशयसूत्र मराठी कादंबरीच्या परंपरागत साचेबंदपणाला आव्हान देणारे होते. त्यातल्या एका गावाच्या बेबंदशाहीतून, सुरक्षिततेच्या प्रश्नातून आपल्या सबंध समाजाला रूपकात्मक अर्थ देण्याचे सामथ्र्य आहे. हे खरे तर 1964 च्या सुमारास सबंध देशाचेही रूपक होते. त्यामुळे स्थान प्रधानतेच्या बाहेर कृतीकडे वळणारे नौतिक तपशील ह्या कादंबरीत भरपूर होते. एका जबर शासनाच्या अस्तित्वाशिवाय असा समूह नीट चालत नाही हे एका जबर पाटलाच्या अस्तित्वाने आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या भीतिदायक बेबंदपणाने नानाविध सूचक तंत्रांनी दर्शविले आहे. आबा कुळकण्र्याला हे विघटित समाजीवन सांभाळता येत नाही हे कुळकर्णी कुटुंबातल्या अस्थिर, दुर्बळ वातावरणातून शंकर पाटलांनी ज्या अल्पशब्दकतेतून चितारले आहे ते 1964 साली अपूर्व होते. गावातल्या विविध कुटुंबांतील नवरा-बायकोचे संवाद, गावातल्या गुंडांचे संबंध इ. प्रत्येक तपशिलातून दबावदार नेतृत्वाची गरज सुचवण्यात लेखकाने दाखवलेला निग्रह अभिजात मराठी कथनशौलीचा नमुना आहे. सबंध गावातील व्यवहारांचा भेदरलेल्या समाजजीवनातून विशाल पट दाखवत ही कादंबरी नव्या पाटलाने जम बसवेपपर्यंत चिरेबंद रूप मांडते...
-
Zadvata (झाडवाटा)
कथा ही विविध रूपांनी जशी अवरत असते, तशी मानवी जीवनाची विविध अंगोपांगे ती धुंडाळत असते. तिला कोणतेही मानवी जीवन वर्ज्य नसते. असे असले, तरी त्या कथेच्या निर्मात्या लेखकाच्या वाट्याला विशिष्ट जीवन आलेले असते. त्या विशिष्ट जीवनातील अनेक अनुभवांना आणि त्यांच्या घटकांना तो आपल्या कथेत साकार करत असतो. पण गमतीची गोष्ट अशी, की त्या विशिष्ट घटनाप्रसंगांच्या पदरांना धरून तो विश्वात्मक मानवी जीवन-सत्याचा वेध घेतो. त्यामुळे कथेचा अनुभवाकार, कथेचे शरीर विशिष्ट असले, तरी त्या कथेचा आत्मा, आशय विश्वात्मक असतो. कलात्मक कथेचा हा गुणविशेष असतो. आनंद यादवांच्या 'झाडवाटा’मध्ये याचा प्रत्यय येतो. ते 'झाडवाटा’ धुंडाळत असले, त्या वाटांवरील अनुभव व्यक्त करत असले, तरी त्या कथांचा आशय, आत्मा मात्र सर्वच मानवी मनांना आपलासा वाटतो. 'झाडवाटा’ची ही किमया पानोपानी अनुभवाला येते.
-
Tattvamasi (तत्वमसि)
"नद्यांमध्ये नर्मदा मला सर्वाधिक प्रिय आहे. ही कथा ज्या गोष्टींवर आधारीत आहे त्यात परिक्रमावासी, नर्मदातीरी राहणार्या किंवा पूर्वी कधी राहिलेल्या व्यक्ती, नर्मदाकाठच्या मंदिरांमधील आणि आश्रमांतील रहिवासी या सर्वांकडून ऐकलेल्या गोष्टी, माझ्या नर्मदाकाठच्या भ्रमंतीमध्ये मला समजलेल्या हकीकती आणि थोड्या माझ्या कल्पना यांचा समावेश आहे." असे ह्या कादंबरीच्या लेखकानेच सांगून ठेवले आहे. गुजराती लेखक ध्रुव भट ह्यांचा हा कादंबरी नायक अठरा वर्षांनी भारतात परततो ते अंधश्रद्धा आणि धर्मांधता यांनी ग्रासलेल्या प्रजेला योग्य दिशा दाखवण्याच्या उद्देशाने, प्रजेतील सुप्त शक्ती शोधून त्याचा समाजाला लाभ मिळवून देण्याचय प्रयत्नात आदिवासी प्रदेशात त्याला अनेक लोक भेटतात. या लोकांच्या संस्कृती, परंपरा इत्यादींचा परिचय करून घेत असताना त्याला अनेक प्रश्न पिंगा घालू लागतात. त्याचे प्रगत ज्ञान आणि ह्या तथाकथित अशिक्षितांचे ज्ञान ह्यांची 'टक्कर ’ सुरू होते - तीच ह्या कादंबरीची 'ठिणगी’ आहे.
-
Navi Stree ( नवी स्त्री)
नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकर यांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण स्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा, 144 कलम तिला माहीत असायला हव; शिकून तिचा विवाह तर होणारच; पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मन घडणार आहे का, की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां/पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना 1950 मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षानंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते.
-
Gharjavai ( घरजावई)
सामान्य माणूस जगण्यासाठी धडपडत असतो. पुष्कळ वेळा ही धडपड केविलवाणी होते; आणि ती पाहण्यार्याला हसू येते. अनेकदा माणूस आपल्या भोवतालच्या परिस्थितीत जगण्याच्या हेतूने सुसंगती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्या नकळत विसंगती निर्माण होऊन बसते. त्यामुळेही तो हास्यास्पद ठरतो. अशा विनोदाला कारुण्याची एक झाक असते. पुष्कळ वेळा बेरकी माणसे स्वार्थासाठी इतरांना अनपेक्षितपणे चकवतात, हास्यास्पद बनवतात. तटस्थपणे पाहणार्याला त्यांच्या गावरान चलाखपणाचे कौतुक वाटते. तो बेरकीपणा पाहून मन चकित होते. क्षणभर ओठांवर हसू फुटते. अतिशयोक्ती हा तर विनोदाचा आत्माच असतो. आनंद यादवांच्या प्रस्तुत संग्रहातील कथांतून जो विनोद निर्माण होतो, तो या स्वरूपाचा आहे. तो भाषानिष्ठ किंवा कोटिक्रमनिष्ठ नसून, प्रामुख्याने जीवननिष्ठ आहे. या कथांचा आशयच त्यामुळे विनोदयुक्त आहे. भेटणार्या व्यक्ती, घडणार्या घटना, निर्माण झालेली विपरीत स्थिती यांतून तो आकाराला येतो. त्यामुळे तो प्रसन्न आणि दिलखुलास; तरीही समाजातील विविध प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारा वाटतो.
-
Kundha (कुंधा )
आपण नुसते हामाल हे. हामालावून बी निफ्तर! कशे म्हना. जमिनी लय हाये आपल्याजो, पण नुसत्या नावाले. खरे मालक दुसरेस हे तिचे. शेठ, सावकार, बँका, पतपेढ्या, राजकीय नेते हे मालक हे तिचे. त्येंच्ह्या तालावर नाचतो आपू. ते, नाचवता आन् रंघत शोषून घेता आपलं. कसा वाचीन शेतकरी मंग?' दगा मास्तरानं सांगितलेलं खानदेशी 'तावडी' भाषेतलं हे -हाससूत्र 'कुंधा' या अशोक कौतिक कोळी यांच्या या कादंबरीचा अर्थबिंदू आहे. गावरहाटीतली सनातन संघर्षघंटा कादंबरीतून लेखकाने अशी काही वाजवली की, राजकारणाचा कुंधा वावर आणि शेतच उखडून फेकायला कसा सज्ज झाला; यासंबंधीचा थरार उभा करण्यात ही कादंबरी पुष्कळ विजयी झाली आहे. लेखकाकडे मोठे भाषादव्य आहे, अनुभव सोलून मांडण्याची ऊर्जा त्याच्याकडे आढळून येते. शिवाय गावातील हितसंबंध सडवत ठेवणारी काळोखजन्य वृत्ती सूड, लोभ, बदला, वचपा आणि तंटा यांना एकत्र मिसळून सतत वर कसा नागफणा काढते, याचे भेदक चित्रण 'कुंधा' कादंबरीतून आलेले आहे. कुंधा प्रतीकरूपाने सिद्ध झाला असला तरी शेतीच्या कर्माधर्माशीच तो जखडलेला नाही. गावातील झगड्याच्या मूळाशी हा कुंध्याचा राक्षस आहे. राजकारणानिमित्त बखेडा उत्पन्न करणारा कुंधा तर कादंबरीत खलनायकासारखा वधिर्त झालेला आहे. कादंबरी वतनदार वाडा आणि आसामी वाडा या दोन संघर्षपीठांचा पीळ प्रगट करते. ही दोन्ही संघर्षपीठं क्षीण मतलबांसाठी जीवांवर उठतात. आणि एका अर्थानं दोघंही रक्तबंबाळ होतात.
-
Hasanaval (हसणावळ)
सुमारे तीसपस्तीस वर्षांपूर्वी मराठी लघुकथेला नवा बहर आला. जुनी चाकोरी सोडून धीट अशा काही नव्या वाटा पडल्या. या वाटांपैकी गावाकडील गोष्टी सांगणारी वाट सवघड. वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून जेवढ्या त्रिज्या निघतात तेवढ्या वाटा असू शकतात, हे एका मिरासदारांनी ओळखले आणि स्वत:चीच अशी एक वाट पाडली. हरभयाची आंब, रात्री कोवळ्या पिकावर फडके पसरून सकाळी धरता येते; पण पाणी दिलेल्या, कणसं, लोंब्या धरलेल्या उभ्या पिकांचा वास धरणे कठीण. मिरासदारांची शहामत अशी की, त्यांनी हा विनोद धरला आणि तोसुद्धा त्याच्या खास चवीसकट! उत्तम म्हणून गाजलेल्या मिरासदारांच्या कथांतून हा गावरान विनोद अगदी जसाच्या तसा आढळतो. हेच मिरासदारांचे अपूर्व असे यश आहे.
-
Virangula (विरंगुळा)
धकाधकीच्या आयुष्यात ‘विरंगुळा’ शोधणारे तात्या.... ओढग्रस्त परिस्थितीत विठोबाला दिलासा देणारा ‘पाऊस’.... आयुष्याच्या शेवटापर्यंत भिकुची पाठ न सोडणारे त्याचे ‘भोग’.... लग्नात आडकाठी आणणारा बुधाच्या आयुष्यातील ‘धोंड्याचा महिना’.... औषधांचा खुराक खाण्यासाठी मधूचा ‘आजारी पडण्याचा प्रयोग’.... एका दिवसाच्या भाकरीचा प्रश्न सोडवणारं ‘गवत’.... अशा प्रतिकूल परिस्थितीतही आयुष्यातील आनंद शोधणारी सामान्यातील असामान्य माणसं! द. मा. मिरासदारांनी आपल्या खासशैलीत रेखाटली आहेत. ती आपल्याला ‘विरंगुळ्या’चा क्षण देऊन जातात.
-
Kathepathcha Samudra (काचेपाठचा समुद्र)
काऊन्सेलिंगची गरज हे विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन-तीन दशकांच अपत्य ! ती गरज असणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी 'जाऊ की नको,' ही अवस्था ओलांडण्यात वेळ वाया जातो. तरी बिचकत का होईना, आता लोक काऊन्सेलरकडे जातात. तसे माझ्याकडेही येत. या कादंबरीची नायिका माझ्याकडे आली नव्हती. पण... नायिकेची अस्वस्थ शेजारीण मला भेटायला आली. शेजारी राहणाऱ्या नवविवाहित दांपत्याबद्दल तिनं मला खूप काही सांगितलं. ती निंदा नव्हती. सामाजिक कर्तव्याचं भान असलेली ती शेजारणीला तीन-चार आठवड्यात पाहिलं नाही, वा तिचं बोलणं ऐकलं नाही,असं सांगून अस्वस्थ स्वरात म्हणाली, "नवरा तिला दटावत असल्याचं कानी येतं. तिचे दबले हुंदके ऐकू येतात, म्हणजे ती बाहेरगावी गेलेली नाही. एवढ्या माहितीच्या आधारे मीच त्या 'नायिके' कडे गेले आणि मग... लेखिकेसमोर एका भग्न आयुष्याचा मोठा पट उभा राहिला. लेखीकेमधील काऊन्सेलरने तो उध्वस्त झालेला संसार सावरला. त्याचीच ही कथा...
-
Bhokarwadichya Goshti (भोकरवाडीच्या गोष्टी)
"विहिरीत रॉकेल सापडल्यावर ‘बॉम्बे हाय’सारखी ‘भोकरवाडी हाय’ वंÂपनी स्थापन करून निवांत जगण्याचं स्वप्नं पाहणारा शिवा जमदाडे अन् त्याची कट्टा कंपनी... गुप्त धनाच्या शोधात कुलंगडी शोधणारा नाना चेंगट... साताठ कणसं, शेंदाडं अन् चरवीभर दूध यासारखं बरंच काही उपोषणाच्या आदल्या दिवशीच रिचवणारा बाबू पैलवान... खव्याचा गोळा विकून आलेल्या पैशातनं बायकोला सिनेमा दाखवायचं आमिष देणा-या बापूची झालेली त-हा... चावलेल्या कुत्र्याच्या पाळतीवर फिरणा-या नाना चेंगटाला त्या कुत्र्यानंच कसं बिंगवलं... बावळेमास्तरांना तपकिरीचं व्यसन सोडण्याचा दम देणा-या हेडमास्तरांनी पुन्हा परवानगी कशी दिली.... भोकरवाडीतल्या अशा गावगन्ना, बेरकी, छत्री अन् इरसाल पात्रांच्या पोट धरधरून हसायला लावणा-या आणि द. मा. मिरासदारांच्या लेखणीतून उतरलेल्या खुसखुशीत कथा तुम्ही वाचायलाच हव्यात!"
-
Sarjya (सर्ज्या)
आपण सभोवताली बैलं पाहतो पण त्या मुक्या प्राण्याचं दुख: शब्दात मांडलं पाहिजे असं कुणाला वाटत नाही आणि ते तेवढं सोपंही नाही. पण प्रत्यक्ष काम केल्यामुळेच, वेदनामय जीवनाचा अनुभव घेतल्यामुळेच सुरेश शिंदे ही कादंबरी लिहू शकले. मुक्या जितराबाला खरोखर वाचा असती तर त्यानेच स्वत:ची आत्मकथा जगाला सांगितली नसती का ?
-
Pahili laat (पहिली लाट)
श्री. वि. स. खांडेकरांचा हा चौदावा कथासंग्रह आहे. लघुकथा या साहित्यप्रकाराविषयी प्रसिद्ध पाश्चात्त्य कथाकार बेट्स याने एका ठिकाणी म्हटले आहे : "उत्तम आणि अधम यासंदर्भातील एखादे अप्रकट प्रवचन वाचकांपुढे करावे, एखादे तात्पर्य त्यांच्या मनांवर बिंबवावे, एखादा वेगळा दृष्टीकोन त्यांच्यापुढे ठेवावा किंवा एखाद्या तत्त्वज्ञानाचा शर्करावगुंठित डोस त्यांना पाजावा, या हेतून कधीही कथा लिहिल्या जाऊ नयेत. मानवी जीवनाबद्दलच्या उत्कट कुतूहलापोटी, आनंदसंवर्धनासाठी आणि त्या ज्या मनोऽवस्थेत लिहिल्या गेल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्या वाचल्या जायला हव्यात. असे सामर्थ्य जीमधे आहे, तीच उत्तम कथा !’" या मानदण्डाच्या आधारे सुजाण वाचकांना श्री. खांडेकरांच्या या कथासंग्रहातील कथांचा आस्वाद अधिक उत्कटपणे घेता येईल.
-
Dharmashree (धर्मश्री)
तत्त्वज्ञान हे वेगवेगळ्या विचारशक्तीच्या माणसांमध्ये कशा वेगवेगळ्या प्रेरणा निर्माण करते आणि त्या प्रेरणा व्यक्तीच्या जीवनधारा कशा संपूर्ण बदलून टाकतात याचे दर्शन 'धर्मश्री' कादंबरीत स्पष्टपणे होते. जीवनाबद्दल प्रत्येकाला असलेली श्रद्धा व जीवनाची मूल्ये यांच्यातला संघर्ष व शेवटी निघणारे सत्य यांचा संगम 'धर्मश्री' मध्ये दिसून येतो. हा संगम तत्त्वज्ञानाच्या रुपाने वाहतो, पण कादंबरीची सुबोधता व सौंदर्य बिघडवून टाकत नाही. - विजयालक्ष्मी रेवणकर