-
Gandhali
ऐतिहासिक व्यक्तींवर लेखन करताना देसाईंच्या लेखणीला विशेष बहर आला आहे. गंधालीतील कथाही अशाच व्यक्तींवर, प्रसंगांवर आधारित आहेत. वाचकांची अभिरूची लक्षात घेऊन ऐतिहासिक व्यक्ती विषयी त्यांनी केलेले कलात्मक पातळीवरचे भाष्य, त्यातील प्रामाणिकपणा आणि त्यामागची तळमळ या कथातून जाणवते. स्वप्नवत वातावरण, करूण, शोकात्म शेवट यानं या कथा वाचकाला भारावून टाकतात देशप्रेम, कलामूल्य अशा गोष्टींसाठी जीवन उधळून देणारी आगळी ठसठशीत व्यक्तीचित्रे यामुळे कथा व कथानायक वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात. मनाला उदात्ततेची, शौर्याची जाणीव करून देणारे. व्यक्तीचित्रण, विषयांची निवड करण्याचे कौशल्य आणि मनाला गुंग करण्याचा एकूण परिणाम घडवणारे भाषासामर्थ्य यामुळे "गंधाली’ वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.
-
Goshti Mansancha
तुमच्याच आजीनं तुमच्याजवळ बसून साक्षरतेचे धडे गिरवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तुम्ही काय कराल ? किंवा जर समजा, भारताच्या राष्ट्रपतींनी प्रवासात तुम्हाला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तर... ? किंवा तुमच्या शिक्षकांनी तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त गुण तुम्हाला दिले असले, तर... ? सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या, सत्यघटनांवर आधारित असलेल्या या हलक्याफुलक्या, रोचक आणि मनोरंजक कथांमधून या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. सुधा मूर्ती... प्राध्यापिका, समाजसेविका आणि त्याचबरोबर आपल्या आगळ्यावेगळ्या कथालेखनाच्या शैलीने वाचकांना मोहवून टाकणार्या लेखिका ! या कथासंग्रहात त्यांच्या एका खट्याळ, खोडकर विद्यार्थ्याची, वाचकांचं मन गुंतवून टाकणारी कथा आहे... एक नवा व्यवसाय सुरू करण्याचं आपल्या पतीचं स्वप्न पार पाडण्यासाठी घरखर्चातून बाजूला काढून ठेवलेली गंगाजळी त्यांच्यापुढे आणून ठेवताना लेखिकेला आपल्या आईच्या उपदेशाची आठवण कशी होते, त्याची कहाणी आहे... "मोठेपणी आपल्या खेड्यातील वाचनालयाला पुस्तकांची देणगी देऊन ते तू समृद्ध कर", असं वचन आपल्या नातीकडून घेणार्या, लेखिकेच्या स्वत:च्याच आजोबांची गोष्टसुद्धा यात आहे. या गोष्टी हसवणार्या, खेळकर, ताज्या आणि टवटवीत आहेत. जी गोष्ट आपल्या तत्त्वांना पटली असेल आणि आत्म्याला भावली असेल तीच करण्याचं धाडस आणि आपली स्वप्ने आपणच पूर्णत्वाला नेण्याचं साहस कसं करावं, हे यातील प्रत्येक कथा आपल्याला शिकवते.