-
Warsaw Te Hiroshima
जगाच्या इतिहासावर नजर टाकली तर सार्या जगाचा कायापालट करणारी विलक्षण, प्रचंड विध्वंसक घटना कोणती असेल तर ती आहे दुसरे महाविनाशक महायुद्ध. सारा युरोप आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर गदागदा हलवून सोडायचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेने बेभान झालेल्या हिटलरने वॉर्साच्या रोखाने आपले सैन्य धाडताच, त्याच्या या उद्याम आवेगाला आवर घालण्याचा निर्धाराने ३ सप्टेंबर १९३९ रोजी ब्रिटनने जर्मनीविरुद्ध युद्धाचा पुकारा केला आणि तेव्हापासून दुसर्या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला आणि बरोबर सहा वर्षांनी म्हणजे २ सप्टेंबर १९४५ रोजी या रणयज्ञाची सांगता झाली. या महायुद्धात सत्तावन्न देशांनी भाग घेतला त्यापैकी जर्मनी, ब्रिटन आणि रशिया या तीन राष्ट्रांची अपरिमित हानी झाली विनाशाचे एवढे भीषण तांडव जगाने यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते. एवढे प्रदीर्घ आणि प्रखर झुंज जगाने प्रथमच अनुभवली. वॉर्साच्या रोखाने हिटलरची घोडदौड सुरू होताच या कहाणीचे पहिले पान लिहिले गेले तीन कोटी माणसांच्या रक्ताने. या कहाणीची मधली सारी पाने भिजून गेली आणि तिचे भरतवाक्य छातीवर अणुबॉंब झेलणार्या हिरोशिमाने उच्चारले. जगाला न ओळखण्याइतके बदलून टाकणार्या या महाभयानक घनघोर रणसंग्रामाचा चित्रदर्शी शब्दपट.
-
Antaral Spardha (अंतराळ स्पर्धा)
अंतराळाकडे कुतूहलानं बघणाऱ्या माणसाला आपण अंतराळात प्रवास करावा असं वाटायला लागलं आणि एक नवं युग सुरू झालं. यासाठीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थातच अद्भुत आहे. या सगळ्याची निर्मिती कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन यांच्यासारख्या महामानवांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालल्यामुळे साध्य झाली असली तरी तिचा कळस विसाव्या शतकाच्या मध्यावर झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महासत्तांमध्ये एकमेकांवर हरप्रकारे कुरघोडी करण्यासाठीची रस्सीखेच सुरू झाली. याचाच एक भाग अंतराळावर हुकमत गाजवण्याचा होता. कहर म्हणजे हिटलरच्या नाझी राजवटीत यासाठीच्या तंत्रज्ञानाची पाळंमुळं रचली गेली, हे ऐकून आपण सर्दच होऊ. अंतराळामध्ये प्रथम जाण्यासंबंधीच्या या स्पर्धेची अत्यंत रोमहर्षक, चित्तथरारक, भारावून सोडणारी आणि वेगळ्याच विश्वात नेणारी कहाणी म्हणजे `अंतराळ स्पर्धा`! फॉन ब्राऊन आणि कोरेलियॉव्ह हे दोघे विलक्षण हुशार आणि अफाट जिद्दीचे तंत्रज्ञ या शर्यतीमधले मुख्य प्रवासी ठरले. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणारी ही रंजक सफर खास मराठी वाचकांसाठी!
-
Teenagers A Natural History (टीनएजर्स-अ नॅचरल हिस्
प्रत्येक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या समजून घेणारे पालक वयात येणं का समजून घेऊ शकत नाहीत? कारण ‘वयात येणं’ या घटनेमागे फक्त शारीरिक बदल नाहीत, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, शारीरिक, जीवशास्त्रीय असे सगळेच संदर्भ टीनएजला आहेत. उत्क्रांतीपासून सामाजिकतेपर्यंत सगळीकडेच टीनएजर्सची पाळंमुळं घट्ट रुजलेली आहेत. एरवी पालकांसाठी ‘प्रवेश निषिद्ध’ असणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या अद्भुतरम्य जगाची सफर या पुस्तकाने घडवून आणली आहे. एखादं न सुटणारं अवघड कोडं सोडवताना जसा आनंद मिळतो, तसाच आनंद निसर्गाने घातलेलं कोडं सोडविण्यात आहे.‘टीनएजर्स’चं तर्कापलीकडचं गणित उकलताना जगण्याच्या प्रत्येक पायरीवर आपण अधिकाधिक समृद्ध होत जातो.
-
Sahityapratibha-Samarthya Ani Maryada (साहित्यप्रत
‘साहित्यप्रतिभा-सामर्थ्य आणि मर्यादा’ हा वि.स.खांडेकरांचा व्यक्तिकेंद्रित; परंतु साहित्याच्या अंगाने लिहिलेला समीक्षात्मक लेखसंग्रह होय. यात खांडेकरांनी आपल्या पूर्व व समकालीन नाटककार, कवी, कथाकार असलेल्या सुहृद साहित्यिकांच्या वाङ्मय व व्यक्तिविचारांची प्रज्ञा व प्रतिभा अशा दुहेरी अंगाने स्वागतशीलपणे परंतु नीरक्षीर न्यायविवेकी समीक्षा केली आहे. समकालीनांविषयीची आस्था व्यक्त करणारे हे लेखन सुहृदांचे व्यक्तिगत व वाङ्मयीन योगदान अधोरेखित करते, ते गुण-दोषांसकट! म्हणून प्रज्ञावंत साहित्यिकांची प्रतिभा मूल्यांकित करण्याचा वस्तुपाठ समजून या टीकालेखनाकडे पाहिले जाते. स्वागतशील, आस्वादक समीक्षा लेखनाचा आदर्श ज्यांना अनुसरायचा असेल, त्यांना ‘प्रतिमा आणि प्रतिभा’ प्रतिदर्श ठरावा.