-
Aadim Dukhhache Vartul (आदिम दुःखाचे वर्तुळ)
लोकगीतांची शब्दकळा स्वतःमध्ये मुरवून घेऊन आधुनिक युगातील जगण्याचा वेध घेणारी सशक्त कविता भारती पाटील यांच्या 'आदिम दुःखाचे वर्तुळ' या संग्रहातून भेटते. ग्रामजीवनातील चैतन्याने रसरसलेल्या जगण्याबरोबरच तिथले दुःख-दैन्य कवेत घेणारी ही कविता मनाचा ठाव घेते. कोणतीही चांगली कविता वाचकांना आपल्या गद्य जगण्यापलीकडच्या भावविश्वात सहजपणे घेऊन जात असते. भारती पाटील यांची कविता त्या निकषावर अस्सल ठरते. घासातला घास खाऊ म्हणताना कुणीही परका नसल्याचे सांगताना ही कविता माणसांमाणसांमध्ये उभ्या केल्या गेलेल्या सगळ्या भिंतींना पार करून जाते.
-
Diary Of A Home Minister (डायरी ऑफ ए होम मिनिस्टर)
"समाजकारणाची आस धरून राजकारणात उतरलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री. अनिल देशमुख. छोट्या छोट्या पदांपासून सुरू असलेला हा प्रवास थेट गृहमंत्री पदापर्यंत पोहोचला. गृहमंत्री म्हणून ज्या यंत्रणेवर नियंत्रण मिळवलं, त्याच यंत्रणेतल्या एका सडलेल्या मनोवृत्तीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुढे संकटांची रास उभी केली. आणि एका गृहमंत्र्यांनाच खोट्या आरोपांखाली तुरुंगवास अनुभवावा लागला. ... पण तुरुंगातल्या दिवसांनाही त्यांनी सकारात्मकतेत परिवर्तित केलं. त्यांचा हा विलक्षण, अंतर्मुख करणारा प्रवास... स्फोटक, परखड, तरीही तितकंच काळजाला हात घालणारं विलक्षण आत्मकथन...
-
Da Vinchich Kod (दा विन्चीचं कोडं)
डॉ. कौशिक – सायन्टिस्ट आणि अमृतराव मोहिते – कमिशनर या दोन मित्रांच्या कर्तृत्वाची ही गोष्ट. कायद्यातील अडचणी या विज्ञानाच्या माध्यमातून कशा सोडवता येतात ते हे दोन मित्र दाखवून देतात. जगात लागणारे नवनवीन शोध आपल्या भारतातही कुठे-कुठे उपलब्ध आहेत, हे माहिती असणारे डॉ. कौशिक त्यांच्याकडच्या माहितीचा योग्य जागी कसा उपयोग करतात ते वाचण्यासारखे आहे. अगदी कम्प्यूटरबरोबर एका काही अंशी कोमात गेलेल्या मुलीने केलेला संवाद असू देत अथवा एका बलात्कारी मुलीला न्याय देण्यासाठी तयार केलेला रेकॉर्डर ड्रेस, ए.आय.च्या मदतीने शोध घेतलेलं मृत्युपत्र असू देत अथवा वैज्ञानिक तपासण्यांतून पकडलेली एका चित्राची चोरी असू देत... सगळंच अद्भुत. मुलांबरोबर मोठेही रमतील; कारण वैज्ञानिक कथा असूनही ते तंत्र आपल्या भारतात कुठे वापरले जाते हे समजल्यावर अंगावर अभिमानाचे रोमांच उभे राहतात. हा अनुभव जगण्यासाठी वाचा ‘दा विन्चीचं कोडं!’
-
Chirantan Yashache 10 Niyam (चिरंतन यशाचे १० नियम)
आयुष्यात यशाचा एक अर्थपूर्ण मार्ग शोधताना - यशाच्या मार्गावर जाण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक पात्रता— तारुण्य, उत्साह, बुद्धिमता, आशावाद आणि याचबरोबर असंख्य परिस्थितींतून गेलेल्या अनुभवी लोकांच्या अनुभवातून मिळणार्या आधाराची भासणारी आवश्यकता - अनेक महान स्त्री–पुरुषांंचं आयुष्य आणि त्यांचे योग्य – अयोग्य निर्णय व त्यांचे जीवनावर उमटलेले पडसाद - महान व्यक्तींच्या आयुष्यातलं यश आणि आनंद - काळानुसार बदलत जाणारं यशाचं चित्र - जगात होणार्या कोणत्याही उलथापालथेत कायम टिकणारी मूलभूत वैशिष्ट्यं – ती आचरणात कशी आणायची? - यशाच्या जवळ असावं असं वाटणं; पण यश म्हणजे काय, ते कसं मिळतं आणि ते कसं टिकवून ठेवता येतं, याची उत्तरं स्व-ज्ञान, दृष्टी, पुढाकार, धाडस, प्रामाणिकपणा, संयोगक्षमता, विनयशीलता, सहनशक्ती, हेतू, लवचीकपणा अशा दहा महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमधून मिळतात - यशाचा अर्थ नव्याने तपासून सांगतायत `मारिया बार्टिरोमो!’
-
Ullu Ani Itar Katha (उल्लू आणि इतर कथा)
‘उल्लू आणि इतर कथा’ हा १६ हलक्या फुलक्या विनोदी ललित कथांचा संग्रह आहे. आर. बी. मातकारांची लेखनाची एक स्वतंत्र शैली आहे जी वाचकांना नेहमीच भावते. त्याच शैलीत त्यांनी लिहिलेल्या या खुमासदार कथा मनोरंजक आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात हवे हवेसे वाटणारे हास्याचे क्षण हा कथासंग्रह वाचतांना तुम्हाला नक्की मिळतील.
-
Mansik Aaghat Samjun Ghetana (मानसिक आघात समजून घेताना)
'मानसिक आघात समजून घेताना' हे पुस्तक मानसिक आरोग्यावर गांभीर्याने भाष्य करते. या पुस्तकाचे धागे माझ्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडले जातात. मी शिक्षण घेत असताना आणि करियर करत असताना गुन्हेगारी, तुरुंगवास, व्यसन, बदनामी आणि त्यातून सावरताना नकारात्मक भावना अनुभवल्या होत्या. त्यामुळे झालेला मानसिक त्रास मी सहन केलेला आहे. मागच्या पाच-दहा वर्षांपासून अपराधीपणा, भीती, दुःख आणि राग या टोकाच्या भावना मी अनुभवल्या आहेत. त्या वेळी मला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्यासारख्या अनेकांना मार्गदर्शन मिळेल. माझ्या आयुष्यातली जी वर्षे भयाण अंधारात गेली, त्याला त्यांना सामोरे जावे लागणार नाही. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात लेखिकेचे व्यक्तिगत जीवन आपल्यासमोर उलगडत जाते. त्यांचा खंबीरपणा, आत्मविश्वास, जिद्द, प्रामाणिकपणा, मेहनत आणि हार न मानण्याची वृत्ती याबद्दल कौतुक वाटते. कारण अशा परिस्थितीतून सावरताना माणूस व्यसन, गुन्हेगारी आणि गैरवर्तनाला बळी पडतो. पण अशा कुठल्याही आमिषांना बळी न पडता त्यांनी मानसिक आघाताशी धैर्याने दिलेला लढा प्रेरणादायी आहे. 'जवळच्या व्यक्तीचा मृत्यू' हा आघात सहन करताना अनुभवायला येणारी 'शोक' ही भावना शरीर व मन यावर कसा परिणाम करते, हा सहसा न बोलला जाणारा विषय या पुस्तकात सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. एकूणच आजच्या धकाधकीच्या काळात मानसिक आरोग्याचे महत्त्व ठळक करणारे हे पुस्तक आहे.