-
Shikshankondi (शिक्षणकोंडी)
साखर उद्योग ही महाराष्ट्रातली महत्त्वाची सहकारी चळवळ. आज महाराष्ट्रात जवळपास २०० साखर कारखाने आहेत. साधारणपणे १५ जिल्ह्यांतून ऊसतोडणी कामगार स्थलांतर करून कुटुंबकबिल्यासह या कारखान्यांमध्ये कामाला येतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. या मुलांना शालेय प्रवाहात आणण्याचं काम टाटा ट्रस्टतर्फे पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी कारखान्यामध्ये राबवलं जात आहे. आतापर्यंत ६ ते १४ वयोगटातील २६४८ मुलांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून त्यातील १८२८ मुलांना शाळेतही दाखल करण्यात आलं आहे. स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करत या शिक्षणकोंडीवर तोडगा काढण्यात ‘टीम आशा’ला यश येत आहे. हे काम करत असताना ‘टीम आशा’च्या कार्यकर्त्यांना अनेक बोलके अनुभव आले. खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये आई-वडलांच्या मदतीसाठी कामाला जुंपून घेणारी लहानगी पोरं या कार्यकर्त्यांना भेटली... शाळेचा गणवेश, दप्तर, डबा घेऊन शिकायला जावं असं स्वप्नं बघणारी पोरं भेटली... कोणत्याही अडचणीवर मात करून पोरांना शाळेत पोचवणारे त्यांचे पालकही भेटले... अशाच सगळ्या जिवंत, सळसळत्या अनुभवांचा हा कोलाज म्हणजेच ‘टीम आशा’च्या कार्यकर्त्यांची ही बोलकी डायरी... अर्थात शिक्षणकोंडी !
-
Majha Bharat Ujjwal Bharat (माझा भारत उज्ज्वल भारत
२७ जुलै २०१५... याच दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती आणि तरुणांचे लाडके शिक्षक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं निधन झालं. तरुणांना घडवणं हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठीच ते आयुष्यभर देशा-परदेशांत तरुणांशी संवाद साधत फिरले. आणि म्हणूनच की काय, नियतीनेही त्यांना मृत्यू दिला तो विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच! कलाम आता आपल्यात नसले, तरी ते विचाररूपाने कायमच आपल्यात असणार आहेत, त्यातून आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत. त्यांचे विचार अक्षररूपात आपल्यासमोर यावेत यासाठी कलाम यांचा निकटवर्तीय विद्यार्थी आणि सहलेखक सृजन सिंग पाल यांनी त्यांच्या भाषणातील निवडक उतार्यांचं संकलन या पुस्तकात केलं आहे. प्रेम, सकारात्मकता, मूल्यांची जपणूक, जीवनाविषयक तत्त्वज्ञान, स्वप्नं पाहणं आणि परिश्रमाचं महत्त्वं आदी विषयांवरच्या या भाषणांमध्ये कलाम आपल्या आयुष्यातले अनुभव, कथा-कहाण्या आपल्याशी शेअर करतात. त्यातून आपल्याला एक संदेश मिळतो आणि त्यानुसार कृती करायची प्रेरणा मिळते. या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत – खास करून तरुण पिढीपर्यंत व्हावा म्हणून ही शब्दांजली माझा भारत...उज्ज्वल भारत !
-
Mission India (मिशन इंडिया)
भारत देश बदलण्याची ताकद भारतातल्या तरुण पिढीत आहे, तीच भारताचं आशास्थान आहे. तरुणांचे लाडके गुरू डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक नागरिकापुढे – खासकरून तरुण पिढीपुढे एक मौलिक ध्येय ठेवलं आहे ते म्हणजे, `मिशन इंडिया'चं – विकसित राष्ट्र म्हणून भारताची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्याचं, आपलं मानाचं स्थान निर्माण करण्याचं! हे ध्येय साध्य करण्यासाठी कलाम यांनी विकसित देश म्हणजे काय, त्यांची लक्षणं, त्यांची अर्थव्यवस्था आणि भारताची सद्य:स्थिती यांबद्दल तपशीलवार विवेचन पुस्तकात केलं आहे. तसंच भारत विकसित देश व्हावा यासाठी आपण शेती, रसायन उद्योग आणि बायोटेक्नॉलॉजी, उत्पादननिर्मिती उद्योग, संरक्षण, सेवा क्षेत्र आणि शिक्षण व्यवस्था आदी क्षेत्रांमध्ये कशी प्रगती केली पाहिजे, त्यासाठी भविष्यात कोणती पावलं उचलली पाहिजेत याचा सहजसोप्या शब्दांत उदाहरणासह यात ऊहापोह केला आहे. भारताच्या भविष्यकालीन विकासाच्या दिशेचं भान देणारं... सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारं पुस्तक...मिशन इंडिया !
-
Kalantar (कालान्तर)
गेल्या पन्नास-साठ वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.स्वातंत्र्याच्या कालखंडात महाराष्ट्राने काय गमावले, काय कमावले याचा आलेख काढणारा.त्यात कमावण्याच्या बाजूला थोडेच आणि गमावण्याच्या बाजुला भरपूर असल्याचेच आढळून आले.समाजबदल तर होत होता.तो केवळ बाह्यस्वरूपी होत आहे,का केवळ तंत्रंयानाने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत,की समाजमन वैंज्ञानिक विचारांची कास धरून विवेकवादी होत आहे,धर्माचे अवडंबर कमी होत आहे की वाढत आहे,असे प्रश्नही मनात येऊ लागले... प्रश्नांची उत्तरे शोधू गेल्यास ध्यानात येते की,ज्या प्रकारची पडझड झाली आहे ती स्वागतार्ह बदलापेक्षा किती तरी अधिक आहे... या कालखंडात आपण काय मिळवले आणि काय गमावले याची चर्चा तर सुरूवातीला केली पाहिजे.शिक्षणापासून ते वेगवेगळ्या व्यवसायापर्यंत,समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत,व्यक्तिगत जीवनापासून ते सार्वजनिक जीवनापर्यंत विविध क्षेत्रांतील पडझडीची चर्चा करणे एवढाच या लेखसंग्रहाचा मर्यादित हेतू!
-
Mukkam Post Sanskrutik Fat (मुक्काम पोस्ट सांस्कृत
‘‘दूर कुठेतरी एका कोपऱ्यात अभिजनांचा टिचभर तुकडा आणि दुसरीकडे हा बहुजनांचा अक्राळविक्राळ प्रदेश. मी त्याच्या मध्यावर कुठेतरी उभा... अगदी एकटा. न घर का, न घाट का!’’ - ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ कथेतून --- गेली ३५हून अधिक वर्षं ज्येष्ठ लेखक सतीश तांबे निष्ठेने कथालेखन करून ‘कथेचा चिंचोळा अवकाश’ सातत्याने विशाल करत आहेत. मुठीत काजवा लपवलेला असावा, तशी त्यांच्या कथेत मर्मदृष्टी दडलेली असते आणि जेव्हा ती वाचकाला सन्मुख होते, तेव्हा वाचक चकित होऊन अंतर्मुख होतो. या संग्रहातली ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ ही कथा मराठी साहित्याची सांस्कृतिक चिकित्सा करते. तर ‘यत्र-तत्र-सावत्र’ ही कथा जमिनीच्या रूपकातून केलेलं मानवी अवस्थेवरचं करुण भाष्य ठरते. ‘नाकबळी’सारखी मिश्कील वाटणारी कथा गंभीरपणे स्त्रीपुरुष संबंधांचा वेध घेते. तर ‘संशयकल्लोळात राशोमान’ ही कथा सत्य म्हणजे काय, या प्रश्नाचा रहस्य कथेच्या अंगाने वेध घेते. ‘रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा’ ही कथा म्हणजे जणू कल्पित कसं रचावं याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या आपल्या महाकाव्यांना वाहिलेली आदरांजलीच!
-
Sakshibhavane Baghtana (साक्षीभावाने बघताना)
पोएट टू पोएट' या अभिनव संकल्पनेतून सुप्रसिद्ध प्रतिभावान जर्मन कवयित्री उलरिकं द्रेस्नर हिच्या निवडक जर्मन कवितांचं अरुणा ढेरे व जयश्री हरि जोशी यांनी साकारलेलं अनुसर्जन... ... वेगवेगळ्या देशांतले भूप्रदेश तिथल्या सांस्कृतिक संदर्भांसकट उलरिकं यांच्या काव्यात्म अनुभवाचा भाग झालेले आहेत. त्यामुळे मराठी कवयित्रींच्या अनुभवविश्वापेक्षा तिचं अगदी निराळं आणि समृद्ध असं अनुभवाचं जग तिच्या कवितांमधून समोर येतं. सांस्कृतिक संदर्भांपासून पूर्ण मुक्त अशा स्त्रीशरीराच्या अनुभवापासून थेट मानवजातीच्या उत्क्रांतीच्या इतिहासापर्यंत आणि स्त्री पुरुष संबंधातल्या ताण्याबाण्यापासून बर्लिनच्या भूत-वर्तमानापर्यंत तिच्या कवितेचा विस्तृत पैस आहे... - अरुणा ढेरे हि कविता ध्वनीचे बोट धरून दृश्यप्रतिमांची उकल करते. उलरिकंला शब्दांचे खेळ करायला आवडतात. नवीन शब्दांचे सर्जन करण्यात तिचा हातखंडा आहे. दृश्य रूप हे तिच्या कवितेचे विशेष लक्षण आहे. उलरिकंची कविता माणसा-माणसांतील समीकरणं आणि लालसा, त्यांच्या भावनांचे खेळ, आकांक्षाचे ओझे हे जगाच्या पाठीवर सारखेच असते हे दाखवून देणारी. - जयश्री हरि जोशी
-
Bhumika (भूमिका)
यशवंतराव चव्हाण - महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खेड्यातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कृती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली नव्हती. पूर्वग्रहविरहीत आणि नि:पक्षपणे विचार करणाऱ्या अभ्यासकाला त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात सुसंगतीच आढळेल. केंद्रीय मंत्री असताना यशवंतरावांनी विविधप्रसंगी केलेली निवडक भाषणं, काही वर्तमानपत्रांसाठीच्या व दिवाळीअंकासाठीच्या मुलाखती व काही लेखांचा या पुस्तकात समावेश केला आहे. १९६५ ते १९७९ या चौदा वर्षांच्या कालखंडातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीची त्यांची भूमिका काय होती, याचा चिकित्सक वाचकांना या पुस्तकामुळे मागोवा घेता येईल. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात जवळजवळ पंचावन्न वर्षं डोळसपणे वावरलेल्या यशवंतरावांची वैचारिक बैठक व विचारांची सखोलता विशद करणारं हे पुस्तक... भूमिका
-
Batamimagachi Batami (बातमीमागची बातमी)
हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह' बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह' बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस'कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने... थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते ! अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह' पुस्तक...‘बातमीमागची बातमी !'
-
Dhag (ढग)
‘ढग’ ही ‘चेटूक’ आणि ‘ऊन’नंतर त्रिधारेतील शेवटची कादंबरी. ‘चेटूक’मधून सामाजिक, ‘ऊन’मधून कौटुंबिक आणि ‘ढग’मधून व्यक्तिगत... अशा आत्मशोधक जाणिवांचा प्रवास हे ह्या त्रिधारेचं वैशिष्ट्य आहे. ‘मी कोण ?’ हा ‘ढग’चा काळीजप्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे निनाद काही माणसांच्या मनात कायम गुंजत असतात. पण जगण्याच्या झटापटीत त्याकडे दुर्लक्ष होतं. ढग ह्याच आद्य प्रश्नाशी झुंज देते. ती घेताना आठवणीचा पासवर्ड वापरून ती भूतकाळाच्या गुहेचं दार उघडते.
-
Oon (ऊन)
‘चेटूक’, ‘ऊन’ आणि ‘ढग’ ह्या त्रिधारेतील ‘ऊन’ ही दुसरी कादंबरी. स्त्री-पुरुष प्रेमातला संवाद विसंवादात रुपांतरीत झाल्यानंतर दिघ्यांच्या घराला घोर लागतो. पण रोजचं जगणं कोणाला चुकलं आहे? ते सर्वव्यापी उन्हात सुरूच राहतं. इथे भेटणारी बाया-माणसं आणि मुलं जगण्याच्या नादावर डोलत मोठी होतात. खूप काही कमावतात, खूप सारं गमावतात. राणी आणि वसंताची दोन्ही मुलं प्रकाश आणि विकास कौटुंबिक प्रेमाची ऊब कमावतात. ऊन या उबेचा लख्ख उत्सव आहे. संक्रमण काळात कौटुंबिक प्रेम हे मूल्यं टिकून राहावं ही ‘ऊन’ची आकांक्षा आहे.
-
Brand Factory (ब्रँड फॅक्टरी)
‘ब्रँड फॅक्टरी’ या आजच्या काळाचा वेध घेणार्या कथा आहेत. आजच्या काळातील सामान्य माणसांच्या या कथा आहेत. जागतिकीकरणातून अवतरलेल्या बाजारयुगाच्या भूलभुलैय्यात माणसं हरवली आहेत. एकीकडे स्वप्नांची झगमगती दुनिया आहे, चमकदार जगण्याची मोहिनी पडली आहे. जगण्याचं मान बदललेलं आहे आणि त्यात जगण्याचं भान हरवून गेलं आहे. जणू तारा अगदी हाताशी आहे, पण तो हातात येत नाहीये, अशी अवस्था! त्यासाठी जीवघेणी स्पर्धा, प्रचंड दमछाक आणि घुसमट! जगण्याचा झगडा तीव्र झाला आहे आणि त्यात केवळ फरफट दिसत आहे. या सगळ्या उलथापालथीत माणसातून हरवत चाललेला ‘माणूस’ या कथा अधोरेखित करीत आहेत. या कथा विचारत आहेत, आपण अजून ‘माणूस’ आहोत ना? आपला ‘ब्रँडेड रोबो’ तर झाला नाही ना? मनोहर सोनवणे यांच्या लिखाणात प्रचारकी थिल्लरपणा नाही. ते तटस्थ आहेत अन संवेदनशीलही. त्यामुळे ‘ब्रँड फॅक्टरी’ला कलात्मक मूल्य प्राप्त झालंय, यात शंका नाही. – अंबरीश मिश्र मनोहर सोनवणे यांचं लिखाण म्हणजे एका संवेदनशील मनाने आपला भोवताल टिपल्यानंतरची स्पंदनं आहेत. त्यात आपल्या भोवतालाचं सूक्ष्म निरीक्षण आहे आणि त्या भोवतालात गुंतलेल्या आर्थिक-सांस्कृतिक धाग्यांची खोल जाणीवही आहे. – वसंत आबाजी डहाके
-
Fakiriche Vaibhav (फकिरीचे वैभव)
लेखक शेतजमीन नांगरावी तसं आपलं आयुष्य नांगरतो. आयुष्य नांगरताना बहुजीवांचं जगणं उलगडत जातं. त्यातलं काय पकडू आणि काय सोडू असं होतं. तरीही उपेक्षितांचा, विस्थापितांचा अंतर्दाहच आपलासा वाटत राहतो. त्यातूनच चुंबकाप्रमाणे वेदना मनाला खेचून घेते. मग तीच वेदना शब्दातून पाझरू लागते. तिफणीतून बियाणं पेरत जावं तसं अक्षरांच्या ओळी कागदावर पेरल्या जातात. शब्द घेऊन त्या उगवतात आणि फकिरीचे वैभव काय असतं याचं दर्शन घडवतात. कार्यकर्ता जेव्हा सर्वस्वी स्वतःला झोकून देत दुःखीतांचं दुःख हलकं करण्यासाठी झटतो तेव्हा तो खर्या अर्थाने उपेक्षित-पीडितांच्या वेदनांनी होरपळून निघतो. पण वेदनांची ही धग त्याला आणखी बळ पुरवते आणि तो पुन्हा पुन्हा नव्या जोमाने लोकांसाठी झटत राहातो... स्वतःला फकीर बनवत... कारण ही फकिरी त्याला श्रीमंत करत राहाते माणूस म्हणून... कार्यकर्ता म्हणून... त्याचसाठी भूकेलेल्या एका कार्यकर्त्याचं हे वेदनाकथन... त्याच्यातल्या वैभवसंपन्न फकिराचं दर्शन घडवणारं... एकदा वाचायलाच हवं असं सत्यकथन!