-
Asahi (असंही)
प्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत लेखनाचे सर्व प्रकार हाताळले.यात वृत्तपत्रातले हुकमे हुकूम सदर-लेखनही होते. अनुभव घेण्याच्या व त्यांवर सवेदनशील चिंतन करण्याच्या तिच्या सवयीमुळे सदर-लेखनातही तिला रस लागला होता आणि तिच्या इतर व्यापातही ती असे लेखन अंगावर घेऊन ते नियमितपणे करीत असे. तिच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह. आणखी बरेच सदर-लेखन तिने केले, ते संग्रहित नाही. या संग्रहातील काही लेखनात कथेच्या शक्यता जाणवतील. कथा माध्यमाची तिची आवड आणि या माध्यमावरील तिची पकड लक्षात घेता हे साहजिक होते. परंतु हे लेखन केवळ ललित नाही. त्यात सामाजिकतचे गंभीर भान आहे. यामुळे ते नेहमीच्या ललित सदर-लेखनापुढे अजून एक पाऊल गेले आहे.
-
Janmalelya Pratyekala
गाडगीळ - गोखल्यांची नव-कथाही जुनी वाटावी इतक्या नव्या आणि अनपेक्षित वाटांनी मराठी कथा गेल्या काही वर्षात पुढे निघाली आहे. हे नावीन्य घाटाचे, तंत्राचे किंवा शैलीचे म्हणजे वरवरचे नसून गाभ्यातले, अनुभवाचे आणि त्या अनुभवाकडे बघण्याच्या निडर दृष्टीचे आहे. मराठी साहित्यात आजवर अ-स्पर्शित असे हे जीवनानुभव ही ज्यांच्या लेखनाची खासियत त्या कथाकारात प्रिया तेंडुलकर यांचा समावेश केला जातो. त्यांच्या एका कथा-संग्रहाची ही नवी आवृत्ती.
-
Panchatarankit
तिनं पाहिलं आहे! ’पंचतारांकित’ उपाहारगृहातील रंगढंगांपासून रस्त्यावरच्या धुळीत बरबाद होऊन चाललेल्या निष्पाप बालिकेपर्यंतचे सगळे जग... हे जग जसेच्या तसे वाचकांसमोर उभे करणारी, कधी उपरोधिक तर कधी करुणार्द्र, कधी चिंतनशील तर कधी अल्लड हसरी अशी मनोज्ञ लेखनशैली तिच्यापाशी आहे. सत्यशोधकाची तत्त्वचिंतक बैठक बालपणापासूनच साहित्यिक पित्यामुळे तिला लाभली आहे. अन्यायाकरिता झगडणारी ’रजनी’ तर ती आहेच! पण खरी आहे ती हे जग सुंदर कधी होईल म्हणून आपले स्वप्नाळू डोळे जगाकडे लावून बसलेली स्वप्नवेडी प्रिया तेंडुलकर...
-
Baimanoos
घरात बाईमाणूस असले म्हणजे घराला घरपण येते, असे म्हणतात. पण स्त्रीची अवहेलना गेल्या अनेक शतकांपासून होत आहे. स्त्रीला पुरुषापेक्षा दुय्यम, कमकुवत व दुर्बल समजल्याने तिच्या विकासाची पहाट स्त्रीमुक्ती चळवळीनंतर उगवली. स्त्री ही मानव आहे. पुरुषांच्या बरोबरीने तिला हक्क, अधिकार आहेत, तिला स्वतंत्र स्थान आहे, हे सांगण्यास सुरुवात झाली. या चळवळीचे वर्णन 'बाईमाणूस' मधून करुणा गोखले यांनी केले आहे.
-
Bra ('ब्र')
'ब्र' कविता महाजन राजहंस प्रकाशन राजकारण,आर्थिक ओढगस्ती,नात्यांची गुंतागुंत,मनाची उलघाल आणि सामाजीक दडपणं या खाली घुसमटलेल्यांनी धाडसानं उच्चारलेला ’ब्र’ आणि त्याचे बरेवाईट परिणाम दाखवणारी मर्मभेदी कादंबरी
-
Maza Nav Bhyrappa
एस. एल. भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले आणि मराठी वाचकांमध्येही लोकप्रिय ठरलेले एक अग्रगण्य कानडी कादंबरीकार. मानवी नात्यांमधली गूढ गुंतागुंत उकलून दाखवणारे आणि अवघा जीवनसंघर्ष सप्तरंगांमध्ये चितारणारे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असणार्या भैरप्पांचं हे प्रामाणिक आत्मचरित्र. जे जसं घडलं, ते तसं सांगणारं. नातेवाइकांपासून सहकार्यांपर्यंत सर्वांचीच - अगदी हितशत्रूंचीसुद्धा - आवर्जून दखल घेणारं. त्यांच्या आयुष्यातले आणि साहित्यिक जडणघडणीतले असंख्य चढउतार, यशापयश, सुखदुःखं... सारं काही वाचकांसमोर मांडून ठेवणारं. आत्मचरित्रांच्या दालनाची समृद्धी वाढवणारं एक पारदर्शी पुस्तक.
-
Kimayagar (किमयागार )
सुरुवातीलाच एक प्रांजळ कबुलीजबाब! या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली चूक होती. पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळया विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील, ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहे. एखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात, तसं हे पुस्तक आहे. अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं, याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. पद्मविभूषण वसंत गोवारीकर विश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दिप्तीमान वारसा आहे. ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात. उदाहरणार्थ, मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणाऱ्या 'मॅक्स्वेल'ची ओळख किती जणांना असेल? विज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा, त्यांच्या निर्मितीमागच्या झगडयाचा आणि त्या घडवणाऱ्या 'किमयागारां'चा रोमहर्षक इतिहास सांगणारे हे आगळेवेगळे पुस्तक. पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निसर्गनियम शोधून काढण्यामागची ऊर्मी, संशोधनातील निर्मितीचा आनंद व या वैचारिक साहसातील थरार! तो लेखकाला स्वत:ला भिडलेला असल्यामुळे ते लेखन जिवंतपणे वाचकांपर्यंत पोचते. अतीश दाभोलकर, (भटनागर पुरस्कारविजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक) पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08.