-
Franklin Roozvelt
1928च्या त्या काळया गुरूवारी अमेरिकेतील शेअरबाजार साफ गडबडला, पार कोसळलाच! उद्योगधंदे ठप्प. बँका बंद. महामंदीचे सावट. प्रचंड बेकारीचे अरिष्ट. जनता पुरती हवालदिल.त्या अंधारलेल्या वातावरणात एका पोलियोग्रस्त नेत्याने देशाला दिलासा दिला. चाकोरीबाहेरचे नवे धोरण आखले. सर्व थरांतील बेकारांना हाताशी धरून त्याने असंख्य प्रकल्प उभारले. अर्थव्यवस्थेला चालना दिली आणि देशाचा कायापालट घडवला. एक संकट निवारले जाते आहे, तोच दुसरे महायुध्द समोर उभे ठाकले. तो डगमगला नाही. हुकुमशहांच्या विरोधात तो उभा ठाकला. त्यांचा नि:पात करून त्याने जागतिक शांततेचा पाया रचला. चार वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवणारा तो एकमेव नेता ठरला.फ्रँकलिन डिलॅनो रूझवेल्ट हे त्याचे नाव. अमेरिकेचा तारणहार ठरलेल्या त्या जिद्दी नेत्याची ही यशोगाथा!
-
-
Sinar
मृणालिनी चितळे यांच्या कथांत आधुनिक मध्यमवर्गीय जीवनातील स्पंदनं उमटलेली आहेत. शाळेत शिकणाऱ्या मुलीपासून ते वृध्दाश्रमात राहणाऱ्या वृध्देपर्यंतच्या सर्व वयांतील व्यक्ती या कथासृष्टीत वावरतात. तीत माणसामाणसातला संघर्ष आहे.जिव्हाळाही आहे. अबोल ताण आहे. मन:पूर्वक प्रेमही आहे. मित्रमैत्रिणींच्या संवादात स्वत:च्या प्रश्नांना उत्तरं शोधणारी माणसं आहेत. हिमालयाच्या सहवासात स्वत:चं दु:ख विसरू शकणारी माणसंही आहेत. त्यांच्या सुखदु:खांचं मूळ बदलत्या आधुनिक जीवनाच्या आशाआकांक्षांमध्ये आहे. म्हणून या आजच्या काळाचा स्वर खेचून घेणाऱ्या कथा आहेत.
-
Sunitabai (सुनीताबाई)
सुनीताबाई देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी. मात्र एवढीच ओळख ठेवून त्या वावरल्या नाहीत. लेखक म्हणून त्यांचे स्वतंत्र स्थान साहित्यविश्वात होते. पुलंना सांभाळत त्यांचे लेखनव्यवहार सांभाळणाऱ्या, प्रसंगी कर्तव्यकठोर भूमिका निभावणाऱ्या, माणसांना जोडणाऱ्या तीक्ष्ण बुद्धीच्या, तर्कशुद्ध विचार करणाऱ्या सुनीताबाई यांची समाजातील प्रतिमा वेगळी होती. मात्र, त्या मित्रपरिवार त्यांचे खरे व्यक्तिमत्व जाणून होता. पुलंच्या निधनानंतर काहीशा हळव्या झालेल्या सुनिताबाईंची ओळख मंगला गोडबोले यांनी 'सुनीताबाई' मधून करून दिली आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण यातून कळते. त्यांचे हे स्मरण प्रेरक व उद्बोधक आहे.
-
Eka Dishecha Shodh (एक दिशेचा शोध)
'भारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्त्रायल,-पॅलेस्टाइन असे देशादेशांमधील संघर्ष. सा-या जगाला टांगत्या तलवारीसारखा भेडसावणारा दहशतवाद. पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्या राहणा-या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या. भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण, अनारोग्य, बेकारीचे प्रश्न. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता दाखवत आहे जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत. जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणा-या संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारे एका दिशेचा शोध '
-
Tichi Mohini
इनग्रिड बर्गमन.– जगाच्या दिलाची धडकन ! रॉबर्तो रोस्सेलिनी.– तिचा प्रतिभाशाली इटालियन दिग्दर्शक नवरा. सोनालिनी दासगुप्ता.– एक भारतीय बंगाली गृहिणी. प्रत्येक देखण्या स्त्रीच्या रसरसून प्रेमात पडणा-या आणि तेवढ्याच उत्कटतेनं प्रत्येक प्रेम नव्यानं जगणा-या रोस्सेलिनीच्या अजब प्रेमाची ही गजब कहाणी !
-
Mark Englis (मार्क इंग्लिस)
हा माणूस एव्हरेस्ट चढला त्याची गोष्ट ....मार्क इंग्लिस...पाय नसलेला हा माणूस आपल्या कृत्रिम पायांनी एव्हरेस्ट चढला. त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची, अथक आणि शास्त्रशुद्ध प्रयत्नांची ही गोष्ट आहे. दोन्ही पाय नसताना जगाच्या सर्वोच्च शिखरावर- माउंट एव्हरेस्टवर चढलेला जगातील पहिला आणि आजवर एकमेव असा हा माणूस. न्यूझीलंडमध्ये लेखकाची आणि मार्कची प्रत्यक्ष भेट झाली. त्या वेळी हा प्रचंड ऊर्जेचा स्रोत मराठी माणसांपुढे यायला हवा, असे लेखकाला आतून वाटले आणि या पुस्तकाचा जन्म झाला. पाय नसलेल्या या दंतकथेपुढे माउंट एव्हरेस्टने आपले गुडधे अक्षरशः कसे टेकले, हे वाचायलाच पाहिजे.
-
Sangatye Aika
एक प्रकारच्या निरागस वृत्तीने हंसाबाई आपल्या जीवनाकडे पाहात आहेत व त्याचे कथन करीत आहे. ह्या सर्वच कथनातून व्यक्त होणारा उदार समंजसपणा - ह्या समंजसपणाला सर्वत्र दुःखाची किनार आहे- 'सांगत्ये ऐका' या आत्मकथनाची पातळी एक सारखी उंचावीत आहे, बरेचसे अबोल असलेले हे हंसाबाईंचे आत्मचरित्र अत्यंत बोलके आहे. मराठीत आत्मगौरव, आत्मसमर्थन, आत्मस्पष्टीकरण, आत्मप्रदर्शन ह्या उद्देशांनी लिहिलेली आत्मचरित्रे बरीच आहेत. ह्यांतील अनेकातून व्यक्त होते ती विलक्षण आत्मसंतुष्टता. हंसाबाईंच्या आत्मकथनाला आत्मसंतुष्टतेचा दुर्गंध कसा तो येत नाही. सुगंध येतो तो दारुण असमाधानाचा. आपल्याच जीवनाचे सत्य आपणच अवलोकणे सोपे नसते. हे अग्निदिव्य हंसाबाईंनी केले आहे. यशाचा अभिमान नाही. भोगल्याचं दुःख नाही; अशा निःसंग निरामयतेमुळेच काळजाला भिडणारं हंसा वाडकरांचं आत्मचरित्र.
-
Jave Tichya Vansha
मराठीतील जुन्या नव्या कथाकारांच्या गर्दीत काही नावे आरंभापासूनच वेगळी उमटून पडली, त्यात प्रिया तेंडुलकर हे नाव येते. हा त्यांचा तिसरा कथा-संग्रह. ज्याचा त्याचा प्रश्न, जन्मलेल्या प्रत्येकाला हे आधीचे. सहसा पांढरपेशा वाचकाला न भेटणारे अनुभव, त्यांची थेट व आरपार हाताळणी, कथेतील रौद्र नाट्य हेरून ते साक्षात समोर उभे करण्याचे सामर्थ्य आणि मानवी मनातला हळवा गुंता हळुवार हाताने सोडवून तो नेमका मांडण्याचे कौशल्य ही या कथांची वैशिष्ट्ये. मात्र जीवनाकडे - यात स्त्री-जीवन आले - पाहण्याची स्वत:ची एक स्वतंत्र दृष्टी हे या लेखनाचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या कथांहून उजव्या कथा मराठीत भेटतील. या कथांहून डाव्या कथांचीही उणीव नाही. मात्र या कथांसारख्या कथा मराठीत फक्त प्रिया तेंडुलकर याच लिहू शकतात म्हणून या कथा-संग्रहाचे महत्त्व.