-
Ravanayan (रावणायन)
श्रीलंकेत रामापेक्षा रावणाचे भक्त जास्त आहेत. रामाचे दिव्यत्व मान्य करताना सर्वच बाबतीत बलाढ्य असलेल्या, सोन्याची लंका निर्माण करणाऱ्या रावणाकडे आपले दुर्लक्ष झाले का ? वस्तूच्या तीन बाजू पाहायची सवय झाल्याने उरलेल्या कितीतरी बाजू अज्ञात राहतात हे मान्यच करावे लागेल. या अज्ञाताचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे लेखन आहे. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांनी अनेक लेखक-कवींना प्रतिभावंत केलेले आहे. आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही स्तरांवर प्रयोगशील लेखन अनेकांनी केले आहे. याच प्रयोगशील लेखनाच्या परंपरेत यामिनीताईंचे लेखन 'रावण' या अतिप्रचंड व्यक्तिमत्त्वाला सहानुभाव व्यक्त करणारे आहे. पारंपरिक रचनाबंध नाकारून, त्यातील कृत्रिमता तोडून यामिनीताईंनी नवा रूपबंध आकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सहजसुलभ भाषेतून घडवलेले विदारक अनुभूतींचे दर्शन, कालिक संदर्भ जागविणारे भाषारूप, भाषिक कृतींची विविधता अशा अनेक वैशिष्ट्यांसह हे पुस्तक वाचकांच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास वाटतो.
-
Beda (बेडा)
परिघाबाहेर असलेल्या भटक्या विमुक्तांच्या जीवनाचे चित्रण अशोक पवार यांनी या आधीच्या कादंबऱ्यांमधून केले आहे. 'बेडा' ही कादंबरी बहुरूपी या भटक्या समाजाच्या जगण्यातील व्यथांना शब्दरूप देणारी आहे. भटके लोक पाल देऊन राहतात त्या जागेला 'बेडा' म्हणतात. जात पंचायतीच्या रूपाने असलेली जातीअंतर्गत शोषणाची व्यवस्था, कायम वाट्याला आलेले विस्थापन, प्रस्थापित समाज व्यवस्थेकडून पदरी येणारी अवहेलना या बाबी 'बेडा' मधून पानोपानी दिसतात. ठेचाळत का होईना पण चालू असलेल्या प्रबोधनाच्या चळवळी आणि त्यातून होत असलेली जागृती अशा आशादायी वळणावर ही कादंबरी संपते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही भटक्या समाजाचे प्रश्न अजूनही संपले नाहीत याचा प्रत्यय ही कादंबरी वाचून येतो. -- आसाराम लोमटे
-
Katha Sanhita (कथा संहिता)
मराठी कथा साहित्यामध्ये आजच्या घडीला कथा अभ्यासकाची वानवा आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. सुनील साळुंके यांच्या पुस्तकातील कथालेख वाचल्यानंतर एक आश्वासकता त्यात आढळते. त्यांनी निवडलेल्या कथेकडे कथा अभ्यासक कोणत्या परिप्रेक्ष्यातून पाहतो हे पाहणे अधिक उद्बोधक आहे. एखादी कथा आपल्या अभ्यासासाठी निवडताना तिच्याकडे आस्वाद म्हणून पहायचे की, चिकित्सा म्हणून पहायचे, की या दोन्हीच्या सरमिसळीतून त्या कथेकडे बघायचे ? त्यापेक्षाही श्री. साळुंके हे कथांतर्गत आशय आणि त्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन ठेवतात. त्यांनी निवडलेली कथा, त्यातील भाषा सौष्ठव, विस्तार, वळणे, लावलेला अन्वयार्थ अचूकपणे आपल्यासमोर ठेवतात. कथेचा आस्वाद घेताना कथांतर्गत असलेल्या सौंदर्य स्थळांचा तिच्या आशयासह उकल आस्वादक या नात्याने करतात. या पुस्तकात त्यांनी निवडलेल्या कथा या मराठीतल्या "मास्टरपीसच" आहेत. यावरून श्री. सुनील साळुंके यांच्या अभिरूचीची, परिपक्वतेची कल्पना येते. कथेचा परिचय करून देताना त्यांनी आपली भूमिका आस्वादक ठेवलेली आहे आणि त्यामध्ये वाचक देखील पूर्णपणे सहभागी होईल याचे भान त्यांनी जपलेलं आहे. मधल्या काळात कथा वाङमयाची पीछेहाट होण्यापाठीमागे अनेक वाङमयीन व्यवहार कारणीभूत ठरले आहेत. तरीही श्री. साळुंके यांच्या कथाभ्यास- संहितामुळे कथा विरोधी प्रवाहाला निश्चितच आळा बसून, नवे कथालेखक आणि अभ्यासक कथा वाङ्मयाकडे गांभीर्याने पाहतील. कथा निर्मितीला पूर्वीसारखाच सूर प्राप्त होईल. इतकी आश्वासकता त्यांच्या कथाभ्यास-संहितेमध्ये असल्याचे दिसून येते.
-
The Last Courtesan (द लास्ट कोर्टेसान)
१९९३ मधील बो बाजार बॉम्बस्फोटामुळे कोलकाता येथील व्यस्त व्यावसायिक जिल्ह्यातील कोठा संस्कृतीचा अंत झाला. पुढच्या काही वर्षांत डान्स बार आणि डिस्को म्युझिकने मुजरा, कथ्थक आणि ठुमरी या जुन्या काळातील मंत्रमुग्ध करणाऱ्या कलांची जागा घेतल्याने तवायफांनी आपला व्यवसाय सोडण्यास सुरुवात केली. रेखाबाई या तवायफसमोर अनिश्चित भविष्यकाळ उभा ठाकला होता. तिने कुठे जावे? तिने पुढे काय करावे? रेखाबाई मुळात कंजारभाट जमातीतील. तिला अत्यंत कोवळ्या वयात विकले गेले आणि तवायफ बनण्याचे धडे दिले गेले. १९८० च्या दशकात कोठ्यांना अभिजात कलेचा मान मिळत नव्हता. तो अदाकारीच्या वेषात असलेला वेश्याव्यवसाय आहे, अशी समाजाची समजूत होती. त्यामुळे तवायफच्या कलेला नाकारले गेले. अशा काळात रेखाबाईंनी कलकत्ता आणि बॉम्बेमध्ये एक गायन- नृत्य करणारी प्रसिद्ध कलावंत म्हणून नाव कमावले. तो एक काळ होता, जेव्हा तिला बंदुका, गुंड आणि गालिबच्या गझलांना हुलकावणी देऊन स्वतःची नियती घडवायची होती. मोठ्या कुटुंबाचा गुजारा करायचा होता. शिवाय मुलाला इंग्रजी माध्यमाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये वाढवायचे होते. या हृदयस्पर्शी आठवणीत, तिने कधीही बेताल न होता आपल्या मुलाजवळ तिच्या जगण्याची भावनांनी ओतप्रोत भरलेली अविश्वसनीय कहाणी प्रामाणिकपणे, औचित्यपूर्ण आणि खेळकर शैलीत कथन केली आहे
-
Pandhara Gulmohar (पांढरा गुलमोहोर)
रूढ समजांच्या थोडं पल्याड जाऊन, बदलत्या संदर्भात नातेसंबंध समजून घेता आले तर घालमेलीत कोंडलेली मनं मोकळी होतील, माणूसपणाला अधिक अर्थ येईल, असं विचारभान देणाऱ्या वसुंधरा घाणेकर यांच्या 'पांढरा गुलमोहर' या संग्रहातील कथा प्रगल्भ वाचनानुभव देणाऱ्या आहेत. 'पांढरा गुलमोहर' मधील नऊ दीर्घकथा स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा परीघ विस्तारत नेतात आणि लेखिकेचं समाजभान आपल्या प्रत्ययाला आणून देतात. या कथांमधील व्यक्तिचित्रण, भाषिक वाक्-वळणे, नाट्यात्मता आणि तरल संवेदनशीलता यामुळे 'पांढरा गुलमोहर' हा कथासंग्रह आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारा झाला आहे. समकाळातला वास्तव गुंता, आधुनिक व पारंपरिक संस्कृतीची घुसळण व ताणेबाणे निःसंकोचपणे मांडत असताना कथाकार वसुंधरा घाणेकर यांच्या कथांची बांधणी, आशय आणि अभिव्यक्तिचे अद्वैत साकारते. - - डॉ. महेश केळुसकर
-
Ichhamaran Ek Satyakatha (इच्छामरण एक सत्यकथा)
डॉ.भारत लोटे सर हे अतिशय हुशार, निष्णात, शांत, मनमिळावू व प्रेमळ व्यक्तिमत्त्व होते. त्यांना कुणीही आणि कधीही मदतीची हाक मारली तर ते सदैव तत्पर असायचे. अगदी चोवीस तास काम करूनही डॉक्टरांचा चेहरा नेहमी हसरा आणि आनंदी असायचा. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात गरिबांचा डॉक्टर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य त्यांनी खरे करुन दाखविले होते. त्यांच्या याच रुग्णसेवेची पोचपावती म्हणून शासनातर्फे २००५ साली त्यांना मानाच्या आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ज्या व्यक्तीने स्वतः डॉक्टर असताना रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा समजून आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना वाचवण्यासाठी घालवलं, त्याच व्यक्तीला त्याच्या आजारपणात हॉस्पीटलच्या चुकीच्या ट्रिटमेंटमुळे आणि सरकारच्या मदतीच्या अनास्थेमुळे एवढ्या मोठ्या लोकशाही देशात इच्छा मरण मागावे लागणे यासारखी दुसरी शोकांतिका नाही…
-
Siddha (सिद्ध)
एक बुवा गावात येतो आणि चमत्कार घडू लागतात. बुवाचं माहात्म्य लक्षात येताच धर्ममार्तंड मैदानात येतात. बुवा आमच्याच धर्माचा आहे, म्हणू लागतात. गर्दीची हाव असलेले पुढारीही श्रेय घेण्यासाठी आघाडीवर येतात. समाज आपल्या भोळेपणाच्या झुल्यावर इकडून तिकडं झुलत राहतो. व्यापारीही उतरतात बुवाचा बाजार मांडायला. आणि गावात द्वेष, प्रेम, जाती, धर्म, वर्चस्व, धंदा, समन्वय यांची घुसळण सुरू होते. भावभावना, श्रद्धा, अंधश्रद्धा, व्यापार, जगण्याचे प्रश्न, भोंदूपणा, वास्तवता याबाबतीत पृथ्वी हे एक गाव आहे. आणि पृथ्वीवरच्या प्रत्येक गावाची हीच कथा आहे.
-
Tough Mind (टफ माईंड)
THIS BOOK IS ABOUT MENTAL STREANGTH. HOW TO INCREASE IT IN CHALLANGING TIME.
-
Divyatwachi Jeth Pratiti (दिव्यत्वाची जेथ प्रतीती)
श्री. प्रवीण कारखानीस हे मराठी जगतातील “एकमेवाद्वितीय” म्हणता येईल, असे व्यक्तिमत्व आहे. जीवनावर भरभरून प्रेम करणारे आणि वेगवेगळ्या जीवनानुभवांना साहसाने सामोरे जाणारे कारखानीस, आपल्या अनुभवांनमध्ये इतरांना सहभागी करून घेऊ इच्छितात व त्यासाठी लेखन हे माध्यम निवडतात. साहजिकच, त्यांचे लेखन इतरांपेक्षा वेगळे होते; एकमेव म्हणावे इतके! प्रस्तुत पुस्तकातूनही त्यांच्या या जीवनाभिमुखतेचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. कला, क्रीडा, संगीत अशा विविध क्षेत्रांमधील 'आयडॉल' मानल्या गेलेल्या मान्यवरांचे वर्णन, कारखानीस समरसून करतात. त्यांच्या लेखणीचा गुणधर्मच असा आहे की, वाचकांनासुद्धा वाचताना तसेच समरस व्हावे लागते. कारखानीसांच्या अनुभवांची व्याप्ती अशीच वाढत राहावी व त्या अनुषंगाने मराठी वाचकांच्या वाचनाचा पैसही ! - डॉ. सदानंद मोरे
-
The Kargil Girl (द कारगिल गर्ल)
दि. ३ मे १९९९ रोजी कारगिल भागात पाकिस्तान्यांनी शिरकाव केल्याची बातमी स्थानिक धनगरांनी आणली. मे महिन्याच्या मध्यापर्यंत हजारो भारतीय 'तुकड्या' त्या घुसखोरांना घालवून देण्याच्या उद्दिष्टाने पर्वतांवरच्या भीषण युद्धात गुंतल्या. भारतीय नौदलाने 'ऑपरेशन सफेद सागर'चा पुकारा केला. प्रत्येक पायलट त्यासाठी हजर होता. तोवर युद्ध सुरू असलेल्या भागात स्त्री पायलटला कधी पाठवण्यात आलं नसलं तरी वैद्यकीय स्तरावर जखमींना उचलून आणणं, रसद पुरवठा आणि इतर कामांसाठी त्यांना तैनात केलं जाई. सक्सेनासाठी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची हीच वेळ होती. द्रास आणि बटालिक प्रांतात लष्करी उतारू घेऊन जाणं, सुरू असलेल्या युद्धातून जखमींना उचलून आणणं, ही कामं ती करत होतीच. शत्रूच्या स्थानाबद्दल आपल्या वरिष्ठांना ती अतिशय तंतोतंत माहितीही देत होती. तिच्या एका उड्डाणादरम्यान पाकिस्तानी रॉकेट मिसाइलपासून ती अगदी काही इंचांनी वाचली होती. या सर्वांतून निडरपणे आपलं कर्तव्य पार पाडत सक्सेनाने 'द कारगिल गर्ल' ही उपाधी प्राप्त केली. तिची ही प्रेरणादायक कथा तिच्याच शब्दांत.
-
Beyond Fear (बियॉण्ड फीअर)
वीरचक्रविजेते विंग कमांडर ओ. पी. तनेजा यांच्या नेतृत्वाखाली १९६५ साली पाकिस्तानातील सरगोधा हवाई क्षेत्रावर घातल्या गेलेल्या हवाईछाप्याचा, मनाची पकड घेणारा लेखाजोखा. भय हे अपवादात्मक नसून सर्वच माणसांमध्ये असते हे सांगणाऱ्या, मेजर जनरल इयन कार्डोझो यांच्या 'बियॉण्ड फीअर' या पुस्तकातल्या, या काही कथा. खरा प्रश्न वेगळाच आहे. आपण भीतीचा सामना करतो की त्यापासून पळ काढतो हाच तो प्रश्न. सैन्यदलातले कर्मचारी या भयावर मात कशी करतात हे मेजर जनरल कार्डोझो या तेरा कथांच्या माध्यमातून सांगतात. ते याला 'बायटिंग द बुलेट' म्हणतात. भीतीवर मात करण्याच्या प्रवासात सैनिकाला सन्मान, प्रेम, धैर्य, विश्वास, आशा, निष्ठा हे गुण कसे उपयुक्त ठरतात याच्या कहाण्या मेजर जनरल कार्डोझो अनेक पदरांद्वारे उलगडत जातात. हेच गुण वाचकांनाही त्याच्या दैनंदिन आयुष्यातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. वास्तव आयुष्य हे कल्पनेहूनही विलक्षण कसे ठरू शकते याचा प्रत्यय या कथा देतात.
-
Tarunansathi Ikigai (तरुणांसाठी इकिगाई)
* इकिगाई शोधणं यालाच इकिगाई बनवा * चॅम्पियनसारखं अपयश मिळवा * जगात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं * आतली प्रतिभा बाहेर कशी आणाल? * असामान्य कौशल्य प्राप्तीसाठी 10,000 तासांचा प्लॅन * तुम्हाला सुपरहिरो बनावंसं वाटतं का? * तुम्ही कशामध्ये चांगले आहात? * तुम्हाला कशाचा मोबदला मिळू शकतो? * पैसे कमवण्यासाठी काही कल्पना * आनंदी राहण्याचं रहस्य * आनंदी आणि दीर्घायुषी जीवनामागील कारण * चांगले मित्र कसे बनवायचे? * खर्या प्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी...