-
Day Care (डे केअर)
या कथासंग्रहात एकूण सतरा कथा आहेत. ‘...आणि तुम्ही म्हणता’, ‘डे-केअर’, ‘रामायण- रामायण’ या कथा वेगवेगळ्या अंगाने वृद्धांच्या जीवनावर प्रकाश टाकतात. तर ‘क्षण’ या कथेतून प्रकटते माणसाची किळसवाणी लालसा... ‘गाऱ्हाणं’ कथेतील मालकीण आपल्या मोलकरणीसाठी देवीकडे मागते सन्मान. ‘कॉरिडॉर’मधून व्यक्त होते कोमातून बाहेर आलेल्या अरू या नर्सची व्यथा. ‘जजसाहेब’ या कथेतून व्यक्त होतं पत्नीपीडित पुरुषाचं मनोगत. ‘तर्री’ आणि ‘सहज’ दोन कथा फेसबुक मैत्रीवर भाष्य करणाऱ्या आहेत. एका विशिष्ट विषयावर केलेलं भावरूपी, व्यामिश्र चिंतन, अशा सूत्रातून या कथा साकारल्या आहेत.
-
Yugandhar Shreekrushna Ek Chintan (युगंधर श्रीकृष्ण एक चिंतन)
श्रीकृष्ण ही लोकोत्तर व्यक्तिरेखा; पण केवळ चमत्काराच्या चष्म्यातून त्याच्याकडे न बघता, त्याचं लोकोत्तरत्व जाणून घेणं कसं महत्त्वाचं आहे, ते या पुस्तकरूपी चिंतनातून शिवाजी सावंत यांनी अधोरेखित केलं आहे. ‘युगंधर’ ही कादंबरी लिहिण्याआधी त्या कादंबरीतून श्रीकृष्णाचं व्यक्तित्व ते कसं उलगडणार आहेत, याची ही रूपरेषा आहे. खरंच, मराठी साहित्यात आज श्रीकृष्ण आवश्यक आहे काय?, श्रीकृष्णाचं मराठी लोकजीवनाशी असलेलं अतूट, तिपेडी भावनातं, वैज्ञानिक युगाच्या पसार्यात धर्माचं स्थान कोणतं? श्रीकृष्ण धर्मसंस्थापक होता काय? खरंच, बालकृष्ण कसा असेल? ‘युगंधर’ शीर्षकाची पार्श्वभूमी, तसं ‘युगंधरा’चं सार्थ चित्र एक तरी चितारलं गेलंय का?, ‘कृष्णा’चा युगंधर कसा झाला?, कंस ही गुंतागुंतीची व्यक्तिरेखा कशी?, श्रीकृष्णाचं वास्तव बालपण कसं असेल?, गीतोपदेशासाठी अर्जुनाचीच निवड का?, राधा-मीरेपासूनचे श्रीकृष्णभक्त इ. मुद्द्यांच्या आधारे त्यांनी श्रीकृष्णाचा आणि त्याच्या युगंधरत्वाचा वेध घेतला आहे.
-
Krantikaal (क्रांतीकाल)
`स्वातंत्र्यप्राप्तीसाठी १८५७साली भारतात पहिला देशव्यापी उठाव झाला. तेव्हापासून क्रांतिकाल प्रारंभित झाला असं मानायला प्रत्यवाय नाही. त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत हा क्रांतिकाल संपला नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या क्रांतिसंस्थेचा पुण्यात मोठ्या थाटामाटात सांगता समोर झाला.’ याच इतिहासास साक्षी ठेवून केवळ भारतीय क्रांतीविषयीच नव्हे, तर जगातील अन्य क्रांतिकार्यांचीही दखल यात घेतलेली आहे. `ते सारे लेख क्रांतीचं मूळ सूत्र धरून, प्रस्तुत पुस्तकात एकत्र गुंफले आहेत. अर्थात देशाप्रमाणे व काळाप्रमाणे क्रांतीचं स्वरूप भिन्न होतं जातं; परंतु `क्रांती’ या शब्दाचाच अर्थ ‘आमूलाग्र बदल’ असा घेतला, तर या सर्व देशांतून क्रांतीचं ते सूत्र समान होतं. हा कोणत्याही एका राष्ट्राच्या क्रांतीचा समग्र इतिहास नव्हे!’ भा. द. खेरांच्या या लेखणीचा अनुभव हे पुस्तक वाचल्यावरच येतो.
-
Smashanvasi Aghori (स्मशानवासी अघोरी )
सुमन बाजपेयी लिखित या पुस्तकात अघोरी साधूंच्या गूढ, अनेकदा गैर समजल्या जाणाऱ्या आणि अतिशय दुर्मीळ अशा आध्यात्मिक परंपरेचे सखोल व अभ्यासपूर्ण चित्रण केले आहे. शिवभक्त असलेले हे साधू स्मशानभूमीत वास करून जीवनमृत्यू, शुद्धअशुद्ध आणि सामाजिक नियम, टॅबू यांच्या पारंपरिक सीमा जाणूनबुजून ओलांडत, आध्यात्मिक मुक्तीच्या शोधात कठोर साधना करतात. शरीरावर भस्म धरणे, मानवी अस्थी वा कवटींचा उपयोग करणे आणि सामान्यांना अतिशय टोकाचे वाटणारे इतर विधी हे सर्व त्यांच्या उच्च चेतना प्राप्तीच्या मार्गातील अविभाज्य घटक असल्याचे लेखिका विवेचनात्मक पद्धतीने स्पष्ट करतात. नागा साधूंसारख्या इतर संन्यासी परंपरांपासून अघोरींच्या तत्त्वज्ञानातील व साधनापद्धतीतील वैशिष्ट्यपूर्ण भेदही त्यांनी सूक्ष्मपणे मांडले आहेत. इतिहास, अध्यात्म, सांस्कृतिक अभ्यास आणि मानवी वर्तनशास्त्र यांच्या संतुलित मिश्रणातून बाजपेयी अघोरी परंपरेचे एक आदरपूर्ण, संवेदनशील आणि विद्वत्तापूर्ण चित्र उभे करतात ज्यात अघोरी हे विचित्र वा अघोरीपणाचे प्रतीक म्हणून नव्हे, तर मोक्ष आणि आत्मोद्धाराच्या कठोर मार्गावर निघालेले गंभीर आणि समर्पित साधक म्हणून उलगडतात.
-
Basvanna (बसवण्णा)
गावकुसाबाहेरच्या वस्तीत जन्मलेल्या हुशार बसवण्णाचं स्वप्न असतं शिक्षक होऊन खूप शिकण्याचं; पण त्याच्या होणार्या पत्नीला, चिन्नीला तिची जोगतीण आत्या देवदासी बनवते. देवदासी प्रथेच्या विरोधात काम करणार्या डॉ. दीक्षितांच्या संपर्कात येऊन बसवण्णाही त्यांच्या कार्यात सामील होतो; पण जोगतिणीचे लोक त्याच्या जिवावर उठतात. जीव वाचवण्यासाठी त्याला कबरीत लपावं लागतं, नंतर मुंबईला धारावीत जाऊन राहावं लागतं, किराप्पा मोईली या गुंडाकडे. किराप्पा त्याच्या रखेलीच्या मुलीशी बसवण्णाचं लग्न ठरवतो आणि बसवण्णा तिथून गायब होऊन एका स्मशानात आश्रय घेतो, जवळजवळ दहा वर्षं. नंतर त्याच्या बालमित्राच्या मदतीने त्याला सरकारी नोकरी लागते, चिन्नीशी प्रतीकात्मक विवाह होतो, नंतर सुभद्राशी लग्न होऊन, मुलं होऊन, तो सर्वसामान्य आयुष्य जगतो; पण स्मशानात राहत असताना थोडीफार अघोरी विद्या शिकलेल्या बसवण्णाचा मृत्यू फार विचित्र पद्धतीने होतो. अंगावर शहारे आणणारी सत्यकथा
-
Part Of The Pride (पार्ट ऑफ द प्राइड)
प्राणीशास्त्रज्ञ आणि प्राणी वर्तनशास्त्रज्ञ म्हणून दक्षिण आफ्रिकेतील एका सिंह उद्यानात काम करणार्या तरुण मनुष्य प्राण्याची ही अनोखी कहाणी. लहानपणापासून छोट्या-मोठ्या प्राणी–पक्षी(घरात पाळता येतील) अशांना पाळून, त्यांचं संगोपन करून- त्यांचं बारकाईनं निरिक्षण करण्याची त्याची सवय त्याला सिंहाच्या मनीचे भाव वाचायला मदत करते. मनुष्य प्राण्याचे दैनंदिन काम म्हणजे - जगातील सर्वांत भयानक-घातक जंगलचा राजा असणार्या सिंहाच्या डोळ्यांना डोळा भिडवून स्वत:च्या हाताने खाऊ घालायचं, सिंहिणींनी वाळीत टाकलेल्या बछड्यांना स्वहस्ते बाटलीतून दूध पाजायचं, त्यांच्यासमोर बसून-त्यांच्या पाठीवर झोपून वेळ काढायचा, त्यांच्याशी कधी गवतावर- मोकळ्या जागेत खेळायचं; तर कधी तळ्यात मनसोक्त डुंबायचं आणि जर सिंहाचा मूड असेल तर, कधी कधी त्या सामान्य माणासांसाठी असणार्या भयानक प्राण्यांच्या नाकांचे चुंबन घेऊन त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा अशक्य असा मनुष्य प्राणी आहे ‘केव्हिड रिचर्डसन..!
-
Guinnnessgatha (गिनीजगाथा)
राजेश पांडे यांचं ‘गिनीजगाथा’ हे पुस्तक म्हणजे प्रत्येकाला दिशादर्शक ठरणारं पुस्तक आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून मजल दरमजल करत केलेली देशसेवेच्या कार्याची सुरुवात, बारा विश्र्वविक्रमांपर्यंत येऊन पोहोचली आहे. हे बारा विश्र्वविक्रम करताना त्यांना प्रत्येक पावलागणिक विविध अडचणींचा सामना कसा करावा लागला आणि हार न मानता एकजूट होऊन प्रत्येक विश्र्वविक्रम कसा सध्या केला याची स्थल-कलासहित मांडलेली कहाणीच आहे. ‘तरुणांना सशक्त करणं, म्हणजेच राष्ट्राला सशक्त करणं’ या विचारानं चालणारे राजेश पांडे यांनी तरुणांच्या साथीनं सांधलेले हे बारा विश्र्वविक्रम प्रत्येक वाचकाला आपणही हे साध्य करू शकतो ही जाणीव करून देणारे आहेत.
-
Shulpaniche Adbhut Vishwa (शूलपाणीचे अद्भुत विश्व)
शूलपाणीच्या झाडीत | प्रवेश करण्यापूर्वी... शूलपाणी हे नर्मदेचे हृदय आहे. परिक्रमावासींची खरी कसोटी शूलपाणीच्या झाडीत लागते. पण झाडी हे नाव फार फसवे आहे. झाडी म्हणावे तर झाडी सोडाच हो, पण उन्हापासून डोक्याचे संरक्षण करायला सावलीलासुद्धा झाड नाही. येथे आहेत फक्त डोंगर. उघड्या नागड्या, वैराण व एकांत डोंगरांचा अनंत विस्तार. दुर्गम रस्ता आणि भयानक निर्जनता. नर्मदेच्या प्रदक्षिणेतील हा सर्वात कठीण भाग आहे. यातून कोणीही परिक्रमावासी लुटल्याशिवाय जाऊ शकत नाही. भिल्लांच्या भीतीने अधिकांश परिक्रमावासी झाडी सोडतात, किंवा मग थंडीत जातात. उन्हाळ्यात खडक एवढे तापलेले असतात, की त्यावरून अनवाणी चालणे अतिशय कष्टदायक असते. तहान लागते ती निराळीच. डोंगरामागून डोंगर, वळणामागून वळणे, डोंगरांच्या दाटीवाटीतून रस्ता शोधत निघालेली वेडीवाकडी अरुंद नर्मदा, ही आहे शूलपाणीची झाडी. निसर्गाने जणू नर्मदेच्या धाग्यात डोंगराचा गजरा गुंफायला घेतलेला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन प्रांतांच्या मिलनस्थळावर पसरलेल्या नर्मदेच्या या ऐंशी मैल लांबलचक विस्तीर्ण जागेला 'शूलपाणीची झाडी' असे संबोधले जाते.
-
Sone Aani Mati (सोने आणि माती)
गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली. आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, ललितलेख, लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णन, चित्रपटकथा, काव्य आदी साहित्यकृती वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहे, हे निश्चित!
-
Operation Sindoor Aani Tyanantar (ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर)
दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी आतंकी हल्ला करून, २६ निरपराध प्रवाशांना धर्म विचारून ठार मारले. त्या निर्घृण आतंकी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सशस्त्र सेनादलांनी 'ऑपरेशन सिंदूर' ची कारवाई केली. पाकिस्तान आणि पाक- व्याप्त काश्मिरमधील नऊ आतंकी तळ नष्ट करणे; पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टिम (प्रणाली) चा नाश करणे; पंधरा भारतीय विमानतळांवर केलेल्या पाकिस्तानी हलूयांचा प्रतिरोध करून एकही पाकिस्तानी क्षेपणास्त्र अथवा ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचवू न देणे; आणि अकरा पाकिस्तानी सैनिकी तळांचा तेथील कमांड तथा कण्ट्रोल सेंटर्स सहित नाश करणे, या सर्व घटना भारतीय सशस्त्र सेनादलांनी केवळ ८८ तासांमध्ये (दि. ६ ते १० मे २०२५) यशस्वीरीत्या घडवल्या. परिणामतः पाकिस्तानला युध्दविरामाची याचना करण्यास भाग पाडले. हे अत्यंत कठीण कार्य करून सैनिकी दृष्ट्या प्रचंड यश संपादन केले. त्यामुळे भारतीय सशस्त्र सेनादलांचे, विशेषतः भारतीय वायुसेनेचे, स्थान विश्वामधील अपराजित सेनादलांमध्ये दृढ झालेले आहे. अर्थात 'ऑपरेशन सिंदूर' च्या अतुलनीय यशाच्या मागे भारतीय राजकीय इच्छाशक्ति, सशस्त्र सेनादलांना प्रदान केलेली स्वायत्तता, आत्मनिर्भरता, सशस्त्र सेनादलांचा उत्कृष्ट समन्वय आणि पराक्रम, तसेच त्यांना असलेला डी. आर. डी. ओ., इस्त्रो, आदी संस्थांचा अप्रतिम सहयोग, अशा घटकांमुळे हे अप्रतिम यश प्राप्त झाले. त्याचे विश्लेषण येथे दिलेले आहे.
-
Harit Hindutva (हरित हिंदुत्व)
हिंदुत्वा'ची दोन मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे आध्यात्मिक जीवनदृष्टी, आणि त्यातून घडणारी संयमित उपभोगाची जीवनशैली. तसं जगणं, म्हणजेच खऱ्या अर्थानं 'धर्मपालन'; कारण, त्यातूनच पर्यावरणाची 'धारणा' सुनिश्चित होऊ शकते. पश्चिमी विचार-आचारांच्या प्रभावामुळे आपणच त्याला सोडचिट्ठी दिलेली आहे! त्यामुळे, साऱ्या जगाप्रमाणेच आपल्यालाही पर्यावरणाच्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा काळात, सध्याचं भरकटलेलं हिंदुत्व नाकारत, निसर्गरक्षणासाठी उपयोगी ठरणाऱ्या मूळ हिंदुत्वाची युगानुकूल मांडणी करणारं, आणि त्याच्या आचरणाचा आग्रह धरणारं हे पुस्तक : स्वतः तसं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अभ्यासू आणि तळमळीच्या कार्यकर्त्यानं लिहिलेलं.
-
Nadishta (नदिष्ट)
विषय चाकोरीबाहेरचा आहे .शैली पहिल्या धारेची आहे .थेट कोंडूरा किंवा बनगरवाडीची आठवण करून देणारे लिखाण आहे .'नदीष्ट ' ही मनोज बोरगावकर यांची केवळ कादंबरी नाही . तो आहे त्यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार. 'नदीष्ट ' ही मराठी कादंबरीविश्वातील अकरावी दिशा आहे.