-
Saran (सरण)
जोपर्यंत तुम्ही गर्दीत राहल, तोपर्यंत लोक तुमचा आदर करतील. तुम्ही वेगळा मार्ग चोखाळलात, तर मात्र तुमची धडगत नाही`,... सरोजा आणि कुमरेशनच्या प्रेमाची ही कथा अखेरीस ह्याच वळणावर येते. सामाजिक जातवास्तव नाकारण्याचा प्रयत्न करणारे हे तरुण जोडपे - विवाहबंधनात अडकते खरे! पण एकमेकांसोबत आनंदाने आयुष्य व्यतीत करण्याचे त्यांचे स्वप्न अखेर स्वप्नंच राहते. रंग-रूप-अंगकाठी- बोली यांवरून माणसाची जात ओळखणा-या समूहाच्या द्वेषाला ते बळी ठरतात. स्वप्न की सत्य हे कळेपर्यंत सरोजाला त्या द्वेषाच्या आगीने वेढलेले असते. खोट्या प्रतिष्ठेपायी अल्लड सरोजाचा घेतलेला बळी या कादंबरीने चित्रमय पद्धतीने मांडला आहे.
-
Motiharicha Manus (मोतिहारीचा माणूस)
भूतकाळाच्या जखमांमधून सावरत असलेला, लेखक होण्याच्या वाटेवरचा देखणा असलम आणि लॉस एंजेलिसहून आलेली जेसिका — सामाजिक कार्यकर्ती आणि प्रौढ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री — एका अनपेक्षित भेटीत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात. ही कादंबरी आहे त्यांच्या विसंगत वाटणार्या पण खोलवर जोडलेल्या आयुष्यांची, त्यांच्या संघर्षांची, आणि एका अशांत काळात फुलणार्या प्रेमाची. पार्श्वभूमी आहे भारतात उजव्या विचारसरणीच्या राजकीय लाटेची. आणि ही कथा घेऊन जाते वाचकाला भारताच्या हृदयभूमीकडे — बिहारमधील मोतिहारी या छोट्याशा गावात, जिथून गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रहाची वाट चालायला सुरुवात केली आणि जिथे जॉर्ज ऑरवेलचा जन्म, त्याच्या लेखनविश्वाला आकार देणार्या आठवणींसह, इतिहासात कोरला गेला. ही एक प्रेमकहाणी आहे — केवळ दोन व्यक्तींमधली नव्हे, तर विचार, स्मृती आणि देशाच्या अंतर्मनाशी गुंफलेली.
-
Khol Khol Pani (खोल खोल पाणी)
बुटक्या एका जमीनमालकाकडे कामाला असलेला अस्पृश्य मुलगा. दिवसभर बकर्या चारणारा, शेतात काम करणारा लहान मुलगा... खडतर आयुष्याचे चटके खाताना (सोसताना) मित्रांच्या सोबतीत आणि निसर्गात विरंगुळा शोधणारा. चिमूटभर आनंदसुद्धा धरून ठेवण्यासाठी धडपडणारा... पण, अपार कष्ट आणि पोटाची आग यांत त्याचं चैतन्यमय निरागस बालपण हरवून गेलेला.... या कादंबरीतलं चित्रदर्शी वर्णन, घटना, प्रसंग, पात्रे, संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं भीषण वास्तव वाचकाला अस्वस्थ करतं, खिळवून ठेवतं आणि अंतर्मुख करतं. ‘कुलामाठारी` या पेरुमाल मुरुगन लिखित अत्यंत वाचनीय तमिळ भाषेतील कादंबरीचा तितकाच प्रवाही, परिणामकारक अनुवाद केला आहे सुप्रिया वकील यांनी."
-
Vaghache Katade Pangharnara Shur Sardar (वाघाचे कातडे पांघरणारा शूर सरदार)
अरब राजा रोस्तेवांचा पराक्रमी, निष्ठावान सेनापती अवथांदिल आणि राजाची रूपवती कन्या थीनाथीन, परस्परांच्या प्रेमात आहेत. एकदा त्यांच्या राज्यात एक शूर वीर येतो आणि त्याच्या चौकशीसाठी गेलेल्या राजाच्या सैनिकांना ठार मारून नाहीसा होतो. त्या शूर वीराच्या शोधात अवथांदिल निघतो. खडतर प्रवासानंतर महत्प्रयासाने त्याला तो शूर वीर भेटतो, त्याचं नाव असतं तारियल. तो अखिल हिंदुस्थानचा राजा असतो. त्याची प्रेयसी राजकन्या नेस्तां-दारेजां हिचं ज्या राजकुमाराशी लग्न होणार असतं, त्याला तो ठार मारतो आणि परागंदा होतो. त्याचं राज्य आणि प्रेयसी दोन्हीपासून दुरावतो. त्याची प्रेयसी शत्रूच्या हाती लागते. विरहाने वेडापिसा झालेला तारियल तिचा ठावठिकाणा माहीत करून घेण्यासाठी जंग जंग पछाडत असतो. तिला शोधून आणण्याचं आव्हान अवथांदिल स्वीकारतो. तारियल आणि नेस्तां-दारेजांची भेट घडवण्यात तो यशस्वी होतो का? उत्कट प्रेमाची, मैत्रीची, निष्ठेची उत्कंठावर्धक वळणांनी पुढे सरकणारी महाकाव्यरूपी गाथा.
-
Razor Sharp (रेझर शार्प)
एक अमानुष सीरियल किलर मुंबईच्या रस्त्यांवरून मोकाट हिंडत आहे… त्याने आपल्या बळींची अत्यंत निर्घृण तऱ्हेने हत्या केलेली आहे. नायलॉनच्या दोरीने हात बांधून मृताच्या तोंडात धान्य कोंबणार्या या सीरियल किलरमुळे संपूर्ण शहर भीतीच्या छायेत जगत आहे.. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकाच प्रश्नाने पछाडलं आहे : एकामेकांशी काडीचाही संबंध नसणाऱ्या या सर्व मृतांना जोडणारा दुवा नेमका कोणता आहे? एका चित्तथरारक मालिकेतील पहिल्या ‘रेझर शार्प’ या कादंबरीच्या पानांमधून आश्विन सांघी यांनी पुन्हा एकदा अत्यंत गुंतागुंतीचं, मती गुंग करणारं थरारनाट्य गुंफण्याचं आपलं अप्रतीम कौशल्य उलगडून दाखवलं आहे. ही कादंबरी एकदा हातात घेतल्यावर वाचकांना ती संपवल्याशिवाय खाली ठेवणं शक्यच होणार नाही.
-
Parvati (पार्वती)
पार्वतीचं आपल्या संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत शिवप्रिया पार्वतीच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञात-अज्ञात पैलूंचा वेध घेणारी कादंबरी ! पार्वतीच्या जन्मापासूनच कथा सुरू होते. पार्वतीला तीच सती आहे हे कुणी सांगितलं? तिचा भगवान शंकरांशी विवाह होताना त्याबाबत पार्वतीच्या मातेचं मत काय होतं? पार्वतीने कोणतं युद्ध लढलं? या प्रश्नांच्या उत्तरांसह गणेशाच्या जन्माची पुराणातील एक अपरिचित कथा, कार्तिकेयाची कथा, 'काली'चं रूप आणि मुख्य म्हणजे शंकर-पार्वती संवाद या कादंबरीत वाचकांना वाचता येईल.
-
Shrimant Aanandibai Peshave (श्रीमंत आनंदीबाई पेशवे)
ध चा मा केला नसतांनाही...बदनाम झालेली...पेशवाईतील वादळज्योत... श्रीमंत आनंदीबाई पेशवे यांच्या जीवनावरील एक ऐतिहासिक कादंबरी
-
Swatachya Aatmyachya Shodhat Mahatma Gandhi (स्वतःच्या आत्म्याच्या शोधात महात्मा गांधी)
गांधीजींची पत्नी कस्तुरबा यांचं आयुष्य कसं गेलं. गांधीजी कडून त्यांना कशी वागणूक मिळत होती ...याचा शोध या पुस्तकात लेखकाने घेतल्याचे दिसून येते
-
Dapur te Delhi (दापूर ते दिल्ली)
एकनाथ आव्हाड हे सिद्धहस्त बालसाहित्यकार असून साहित्यातील अतिशय प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार - २०२३ त्यांना मिळाला आहे. त्यांची पुस्तके मुलांबरोबरच शिक्षक आणि पालकांसाठी अतिशय मनोरंजक, उपयुक्त आणि ज्ञानवर्धक आहेत. आव्हाड यांचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील दापूर हे असून त्यांच्या बालपणात डोकावून पाहिले तर एक होतकरू, परिस्थितीवर मात करणारा मुलगा, खाऊच्या पैशात किंवा भाजी विकून मिळालेल्या पैशात पुस्तके विकत घेऊन वाचणारा, गुरुजनांचा लाडका विद्यार्थी ते पुढे मुलांचे आवडते बालसाहित्यकार, कथाकथनकार अशा अनेक रूपांनी आव्हाड वाचकांना भावणारे आहेत. त्यांच्या बालसाहित्यावर दिल्ली दरबारी साहित्य अकादमीची मोहर उमटली, ही आम्हा वाचकांसाठीसुद्धा आनंदाची गोष्ट ठरली. एकंदरीतच दापूर ते दिल्ली असा उल्लेखनीय प्रवास करणाऱ्या आव्हाड यांच्या लेखनाचा आवाका जाणून घेण्यासाठी, त्यांच्या पुस्तकांची अधिक माहिती होण्यासाठी तसेच त्यांचा साहित्यप्रवास आपल्या सर्वांसमोर एकत्रितपणे मांडण्यासाठी केलेला अभ्यासपूर्ण प्रयत्न म्हणजे हे पुस्तक होय.
-
Skalpel Te Skopee Te Robo (स्काल्पेल ते स्कोपी ते रोबो)
ही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रुताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्त्र कार्याची . असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, ‘पुणे टेक्निक' हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या अनोख्या प्रवासाचा घेतलेला वेध.
-
Chal Bas Ek Round Marun Yeu (चल बस एक राऊंड मारून येऊ)
माझ्या 'चल बस, एक राऊंड मारून येऊ!' या कथासंग्रहाचं १७ मार्च २०१९ ला प्रकाशन झालं आणि महिनाभराच्या कालावधीतच पाचशे पुस्तकांची पहिली आवृत्ती दणक्यात संपली. फोटोग्राफी व्यवसायानिमित्त होणाऱ्या भटकंतीतून टिपलेले अनुभव कथेच्या स्वरूपात वाचकांसमोर ठेवण्याचा मी केलेला हा प्रयत्न सर्वांच्या पसंतीस उतरला, याचं समाधान निश्चितच आहे. संवेदना प्रकाशनामार्फत पुस्तकांचं वितरण होतच राहिल, नव्या आवृत्याही निघतील, मात्र पुस्तकाची मागणी वाढल्यानंतर पुस्तक लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवणं हे प्रकाशकाच्या सोबतीने माझंही काम आहे, असं मी मानतो. अशा वेळेस देश-विदेशातल्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी 'ई-बुक' या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे मी ठरवलं आणि त्यासाठी सुप्रसिध्द 'ब्रोनॅटो' या ई-प्रकाशनसंस्थेची निवड केली. ब्रोनॅटोने आजपावेतो अनेक पुस्तके या माध्यमातून वाचकांपर्यत पोहोचवली आहेत आणि आँन-लाईन वाचनाचा आनंद तंत्रज्ञानाशी मैत्री असणाऱ्या वाचकांना मिळवून दिला आहे. वाचक आणि लेखक यांच्यातलं अंतर अशा नव्या पध्दतीने कमी होणं आजच्या नेटयुगात गरजेचंच आहे. माझं हे पहिलं पुस्तक या नव्या रूपात तुमच्या हाती देतांना खूप आनंद होत आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा! - सुहास मळेकर १७ एप्रिल २०१९